आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर जर तीन महिन्यांत शेतकर्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशा ठाम शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकलूज येथे आयोजित सभेत बोलताना आश्वासन दिले. माळशिरस मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ पवार यांच्या भाषणाने झाला.
२००९ च्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पराभूत करण्यासाठी सभा घेतल्या. पण आता आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. ‘अच्छे दिन’चे गजर दाखवून या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ केला. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिलांच्या अपेक्षांचा भंग केला, असे म्हणत त्यांनी सरकारच्या अपयशी कामगिरीचा पाढा वाचला. तर राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी इडीने दाखल केलेला गुन्हा यातील विसंगती स्पष्ट केली. तसेच, करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांना अर्ज वेळेत माघारी घेणे शक्य झाले नाही. मात्र तेथे अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोला विधानसभेचे शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देखमुख यांना राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे.
अपक्ष उमेदवाराला पाठींबा
करमाळा विधानसभा मतदारसंघात वेगळीच राजकीय समीकरण पाहिला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतः चा उमेदवार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठींबा दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार संजय पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही काल अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव आहे, असे संजय पाटील म्हणाले. तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदार संघाचा दौरा पूर्ण केला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळणार आहे. मी पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या विचारानुसार निवडणूक लढवणार, असे संजय पाटील म्हणाले आहेत.