बीड जिल्हा म्हटलं की समोर येतं ते मुंडे यांचे नाव. आधी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी जिल्ह्यावर अधिराज्य गाजवत आहेत. चुलत भाऊ धनंजय मुंडे कितीही आव्हान देत असले तरी मुंडे बहिनींनी बीड लोकसभा मतदारसंघाचा गड कायम राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग अप्पा सोनवणे हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र प्रीतम मुंडे यांनी तब्बल १ लाख ६८ हजार मतांनी सोनवणे यांचा पराभव केला. प्रीतम मुंडे यांचे २०१४ सालातील मताधिक्य यावेळी बरेच कमी झाले असले तरी त्यांनी मतदारसंघ राखला आहे.
डॉ. प्रीतम मुंडे का जिंकल्या?
१) हक्काचा मतदारसंघ – मुंडे परिवाराचा बीड हा हक्काच मतदारसंघ आहे.
२) वंजारी समाज – बीडमध्ये वंजारी समुदाय हा संघटीत आहे. त्याचा फायदा मुंडे कुटुंबियांना राजकारणात होतो.
३) केंद्र आणि राज्यातील सत्ता पथ्यावर – भाजपची केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे दोन्हीकडील योजना जिल्ह्यात आणण्यात प्रीतम मुंडे यांना यश आले होते. तसेच पंकजा मुंडे यांनी राज्यात मंत्रीपद भूषवित असताना अनेक विकासकामे जिल्ह्यात केली. त्याचा फायदा प्रीतम यांना झाला.
४) सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांचा पाठिंबा – राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही नेते पक्षावर नाराज होते. धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर क्षीरसागर यांनी प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. राष्ट्रवादीच्या या मातब्बर नेत्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे प्रीतम मुंडेना सहज विजय मिळाला.
५) गोपीनाथ मुंडेचा वारसा – बीड जिल्ह्याचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर आतोनात प्रेम आहे. सर्वच समाजातून त्यांना माननारा एक मोठा वर्ग आहे. निवडणूक आली की सहानुभूतीची लाट आपोआपच मुंडे बहिणींकडे जाते.