मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीपाठोपाठ शहरात अन्य काही ठिकाणीही आग लागल्याच्या घटना घडल्या. हे अग्नी सत्र अद्याप सुरुच असून, रविवारी दुपारी चारच्या सुमारास कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. दरम्यान, ही आग सध्या पूर्णत: विझली असून शोधकार्यादरम्यान ४ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवल्यानंतर चार जणांचे मृतदेह आढळले. उपलब्ध माहितीनुसार, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनास्थळी अद्याप शोधकार्य सुरु आहे. काल दुपारी चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर चार फायर इंजिन आणि चार जंबो वॉटर टँकर्सच्या मदतीने रात्री साडेदहाच्या सुमारास पूर्णपणे ताबा मिळवण्यात यश आलं.
#UPDATE 4 dead in the fire accident in Damu Nagar near MIDC bus stop in Kandivali (East) in Mumbai, yesterday. Search operation is still going on. #Maharashtra
— ANI (@ANI) December 24, 2018
राजू विश्वकर्मा (वय ३० वर्ष), राजेश विश्वकर्मा (वय ३६ वर्ष), भावेश पारेख (वय ५१ वर्ष आणि सुदामा लल्लनसिंग (वय ३६ वर्ष) अशी दुर्घटनेत मृत पावलेल्या चौघांची नावं आहेत. मृत्यूमुखी पडलेले हे चारहीजण कारखान्यातील कामगार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच ते स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय, खार पश्चिम येथील राजस्थान हॉटेलजवळ असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरही रविवारी सकाळी आग लागली होती. टँकर्सच्या आणि आठ फायर इंजिनच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तळमजल्यावर असलेल्या न्यू ब्युटी सलूनला ही आग लागली होती, ज्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.