मुंबई महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शताब्दी हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीतील ४३४ युनिट रक्त वाया गेलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉस्पिटलकडून, संस्थामार्फत राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबीरांमधून हॉस्पिटलला रक्त पुरवलं जातं. पण, गेल्या पाच वर्षात शताब्दी हॉस्पिटलकडून ४३४ युनिट एवढं रक्त वाया गेलं असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये ११ हजार ४७२ युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. यातील ११ हजार ३१५ युनिट रक्तसाठी रुग्णांसाठी वापरण्यात आला. तर, उर्वरित ४३४ युनिट रक्ताचा वापर न झाल्याने हे रक्त वाया गेले असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिली आहे. पण, यातून रक्तदानाबाबतची जनजागृती आणि रक्ताची गरज याबाबत हॉस्पिटल प्रशासन गंभीर नसल्याची बाब समोर येत आहे.
हॉस्पिटलच्या रक्तपेढीतून रुग्णांना मदत
हॉस्पिटलतर्फे दर महिन्याला रक्तदान शिबीर मोहिम राहवून रक्ताची साठवणूक केली जाते. रक्ताच्या तपासण्या करून आणि त्यातील घटक वेगळे करून ते साठवून ठेवलं जातं. हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास हॉस्पिटलच्या रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून दिलं जातं. पण, या रक्ताची गरज न भासल्यास आणि मुदत संपल्यास हे रक्त फेकून द्यावं लागतं.
दर महिन्याला २ रक्तदान शिबिरं भरवून याद्वारे १०० ते १५० रक्त पिशव्या जमा केल्या जातात. जमा केलेल्या रक्ताची योग्य पद्धतीने साठवणूक केली जाते. या हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांची सिझेरियन, मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. दर दिवशी अंदाजे आठ ते दहा रक्त पिशव्यांची गरज भासते. पण, बऱ्याचदा काही रक्त पिशव्या आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला ठेवल्या जातात. या रक्ताची गरज न पडल्यास ते वाया जातं.
– डॉ. प्रदीप आंग्रे, कांदिवली शताब्दी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक