पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या शहापूर तालुक्यात भूजल संवर्धनासाठी ग्रामपंचायत स्तरावर गावोगावी लोकसहभागातून श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची संकल्पना आता पुढे आली आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील शहापूर तालुक्यातील एकूण 110 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव पाड्यांवर गेल्या महिनाभरात 507 वनराई बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. हे वनराई बंधारे शहापूर तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, आटगाव, अघई, कसारा या परिसरातील घनदाट जंगलातील डोंगर दर्या खोर्यांतील वाहते पाणी अडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
हे बंधारे बांधण्यासाठी विशेष म्हणजे गाव स्तरावर लोक सहभाग होताच. परंतु पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, सामाजिक संस्था, अंगणवाडी सेविका, वन कर्मचारी, कॉलेज विद्यार्थी यांनी पुढाकार घेऊन वनराई बंधारे बांधण्यासाठी श्रमदान करण्यासाठी सहभाग घेतलेला आहे. तालुक्यात बांधण्यात आलेल्या या वनराई बंधार्यांंमुळे नदी, नाले, ओढे यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी मदत होणार आहे. वनराई बंधार्यांत पाण्याची साठवणूक होणार आहे. तसेच भूजल पातळीही वाढून जमीन ओलिताखाली राहण्यास मदत होईल. हे बंधारे उन्हाळ्यात पाळीव गुरांची व जंगलातील पशुपक्षी यांची तहान भागविणार असल्याने हे वनराई बंधारे खासकरून जंगलातील वन्यजीवांना वरदान ठरणार आहेत.