घरमुंबईचतुर्थश्रेणी कामगारही खासगीकरणाच्या विरोधात

चतुर्थश्रेणी कामगारही खासगीकरणाच्या विरोधात

Subscribe

खासगीकरण प्रक्रिया तत्काळ थांबवावी, सरळसेवेची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अनुकंपा तत्वावरील पदे व वारसा हक्काची पदेदेखील तत्काळ भरावीत, बदली कामगारांना तत्काळ शासन सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्यावे अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी सेवांचे खासगीकरण करण्याबाबत स्विकारलेल्या धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ११ ते १३ जून २०१९ या कालावधीत तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबत नोटीस जारी करून राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव, वैद्कीय शिक्षण संचालक, सर्व अधिष्ठाता यांना इशारा दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, सुरेखा चव्हाण, आर. टी. सोनवणे, शासकीय कुटुंब महिला मंचाच्या अध्यक्षा सुवर्णा शेवाळे, सरचिटणीस संध्या भोईटे आदींनी याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या सेवा खासगी कंत्राटदारांना देण्यासाठी शासनाने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. या निविदा मागविण्यात आल्या असून लवकरच त्यानुसार कार्यवाही होत असल्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे भवितव्य संपुष्टात आले आहे. सध्याच्या कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळणार तर आहेच फण अनुकंपा तसेच वारसा हक्क यादीमध्ये अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या उमेदवारांची सरळ सेवेची भरती देखील होणार नाही. त्यांना शासकीय नोकरीस मुकावे लागणार आहे. यामुळे शेतक-यांवर जशी आत्महत्येची वेळ येते तशीच या कर्मचा-यांनाही आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणूनच खासगीकरण प्रक्रिया तत्काळ थांबवून ई निविदा सूचना रद्द करण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

रुग्णालयीन सेवा अतितात्काळ व तातडीच्या सेवेत मोडत असल्यामुळे त्यांचे खासगीकरण आतापर्यंत केले गेले नाही. मात्र जे. जे. व सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी रुजू झालेले अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे या प्रक्रियेत विशेष स्वारस्य घेत आहेत. त्यामुळे डॉ. चंदनवाले यांची तत्काळ बदली करावी, अशी संघटनेची मागणी आहे.

खासगीकरण प्रक्रिया तत्काळ थांबवावी, सरळसेवेची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अनुकंपा तत्वावरील पदे व वारसा हक्काची पदेदेखील तत्काळ भरावीत, बदली कामगारांना तत्काळ शासन सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या पदाऐवजी अन्य कामे देऊ नयेत, त्यामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही, अशा संघटनेच्या मागण्यात आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेने सर्व संबंधितांना तारीख व वेळ देण्याची विनंती केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास मात्र ११ ते १३ जून २०१९ या कालावधीत सर्व राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे. या आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी शासनाची राहिल, असेही संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -