मुंबईमध्ये जशी माणसांची गर्दी वाढली आहेत तशीच वाहनांचीही वाढली आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. यात भरीसभर म्हणून शहरात बेवारस वाहन्यांची संख्याही वाढलेली पाहायला मिळते आहे. एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये तब्बल ६९९ वाहनं ही मुंबईच्या रस्त्यांवर बेवारसरित्या आढळल्या आहेत.
वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा
इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावर उभे असतानाही याकडे पोलीस प्रशासन, पालिका, सरकार या यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तसेच मुंबई हायकोर्टानेही यासंबंधी कोणतीही ठोस पावलं उचलण्याचे आदेश वा कारवाईचे आदेश दिलेले नाहीत. महाराष्ट्र पोलीस कायदा आणि कलम २२२ तसेच वाहतुक नियामक मंडळ यांच्या कलम ८२ नुसार बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. तरीही या गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर पडून आहेत. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या या बेवारस गाड्यांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.
पोलिसांनी केली ५०७ वाहनं परत
वाहतूक पोलीस विभागातर्फे वाहनांसंबंधीची तक्रार नोंदवण्यासाठी नागरीकांना हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडे आतापर्यंत ९४६ वाहनांसंबंधीची तक्रार आली आहे. त्यातील २७४ बोगस तक्रारी असून अद्याप पोलिसांनी ५०७ वाहनं त्यांच्या मालकांना परत केली आहेत. तर १८१ वाहनं अजूनही वाहतूक विभागाकडे पडून आहेत. बेवारस वाहनांमुळे वाहतूक पोलिसांच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे.