मुंबई विद्यापीठ उपकेंद्र येथील ‘स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्स’च्या उद्घाटनाकरिता वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना मुंबई विद्यापीठ प्रशासनाद्वारे आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप)घोषणाबाजी केली. कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना बोलवण्यात आल्यामुळे अभाविपने हा गोंधळ घातल्याचे म्हटले जात आहे. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, कल्याण येथे मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सुरू केल्याबद्दल अभाविप मुंबई विद्यापीठ प्रशासन तसेच महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र वायकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कुलगुरु सुहास पेडणेकर यांचे भाषण सुरु झाल्यावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.