कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय आपआपल्या गावी गेले होते. मात्र, आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सर्व परप्रांतीय मुंबईत परत येत आहेत. सध्या परप्रातींय मासे विक्री करत आहेत. यामुळे स्थानिक कोळी लोकांना याचा त्रास होत आहे. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी तक्रार घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत कोळी भगिनींनी मदत मागितली होती.
बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका
त्यानंतर २४ तासांच्या आत त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला व कोळी भगिनींची समस्या सोडवली अशी माहिती मनसे अधिकृत या टि्वटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020
या महिला थेट कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा अशी मागणी केली. राज ठाकरेंनी त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. फक्त कोळी भगिनीच नव्हे, तर लॉकडाऊनच्या काळात जीम चालक-मालक, सलून व्यावसायिक, मुंबईतील डब्बेवाले यांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या.