येथील प्रभाग समिती कार्यालयासमोर असलेला अमर जवान स्तंभ मोडकळीस आला असून, मनपा प्रशासन आणि राजकीय नेत्यांना त्याची डागडुजी करण्यास वेळ नाही. पुलवामा येथील शहीद जवानांना शहरात सर्वत्र श्रद्धांजली वाहण्यात आली या निमित्ताने अमर जवान स्तंभाची सर्वांना आठवण झाली. मात्र, या स्तंभाच्या दुरवस्थेकडे कोणालाही लक्ष द्यावेसे वाटले नाही
उल्हासनगर 4 येथील प्रभाग समिती 3 कार्यालय आणि व्हिटीसी मैदानासमोर अमर जवान चौक असून, या चौकात अमर जवान स्तंभ उभारण्यात आला आहे. कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ संग्राम फाऊंडेशनच्यावतीने हा स्तंभ उभारण्यात आला आहे. या फाऊंडेशनचे देणगीदार आणि महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये हा स्तंभ उभारला होता. या स्तंभासाठी खास राजस्थानमधून बंदुकीची प्रतिकृती मागविण्यात आली होती.
सध्या या विजय स्तंभाची फारच वाईट अवस्था आहे. स्तंभाजवळील बंदूक तुटलेली आहे. येथील वीज रोषणाई बंद आहे. कारंजे बंद पडलेले आहेत, तर गढूळ पाणी स्तंभाच्या आजुबाजूला साचलेले असून, तेथे डास किटकांची पैदास होत आहे. या संदर्भात संग्राम फाऊंडेशनचे पदाधिकारी काका भोसले म्हणाले की, अमर जवान स्तंभाच्या दुरवस्थेबाबत आम्ही प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व अन्य अधिकार्यांना तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.