जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राळेगणसिद्धी येथे सात दिवस जे उपोषण केले ते बनावट असल्याचे खोचक ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांना विनंती केली. अखेर सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण सोडले. मात्र हे सगळे आंदोलन स्क्रिपटेट असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
९२/९३ साली जसे अण्णा हजारे होते तसे ते आज ही आहेत
मनोहर जोशी मुख्य मंत्री असताना २ शब्द ते बोलले नव्हते २०१४ ते २०१९ अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर आली
अण्णा बोलले नाहीत
आता त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली त्यांनी उत्तम अभिनय केला
आणि आपण मूर्खा सारखे चर्चा करतो— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2019
नेमके काय म्हणाले आव्हाड
२०१४ ते २०१९ या कालावधीत अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. तेव्हा मात्र अण्णा काहीही बोले नाहीत. इतकेच काय तर आधीचे अण्णा आणि आताचे आण्णा यात काहीही फरक नसून १९९२-९३ ला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना देखील अण्णा दोन शब्दही बोले नाहीत, असे आव्हाड यांंनी म्हटले आहे. आत्ताचे आंदोलन म्हणजे आण्णांना लिहून दिलेली स्क्रिप्ट. या स्क्रिप्टप्रमाणे त्यांनी खूप सुंदर अभिनय केला. आपण मात्र या उपोषणावर मुर्खासारखी चर्चा करत आहोत, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
अजित पवार पुन्हा माफी मागणार का..?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘अण्णा हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य केले होते. या चुकीच्या वक्तव्याची अजित पवार यांनी जाहीरपणे माफी मागितली होती. अण्णा हे जेष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांचा आम्हाला आदर आहे, असे अजित पवार म्हणाले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची अजित पवार पाठराखण करतात की, पुन्हा एकदा अण्णाची माफी मागतात हे पाहावे लागेल.