मुंबईतील १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणुकांना येत्या तारखेपासून सुरुवात होत असून यासाठी सोमवारी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले. यामध्ये पाच प्रभागात बिनविरोध निवडणूक होऊन सेनेचे ३ तर भाजपचे ३ अध्यक्ष निवडून आले आहेत. परंतु दहिसर आणि बोरीवली या आर-मध्य व आर- उत्तर ही प्रभाग समिती आजवर शिवसेनेच्या ताब्यात असली तरी यंदा ही समिती काँग्रेसच्या एका मतावर चिठ्ठीवर निघण्याची दाट शक्यता आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी हे भाजपात गेल्यामुळे त्यांच्या विभागातील काँग्रेसचे एक मत शिवसेनेऐवजी भाजपला गेल्यास याठिकाणी संख्याबळ बरोबरीत निघेल आणि चिठ्ठीच्या आधारे याठिकाणी अध्यक्षांची निवड होईल, असे चित्र दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक शिवसेनेच्या बाजूने मतदान करत आहेत. मात्र, या बदल्यात शिवसेनेने या दोन्ही पक्षांना समित्या सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांची यंदा या समित्या स्वीकारण्याची मानसिकता नाही. त्यामुळे यंदा शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय अधिक सहजपणे मिळवता येणार आहे.
केवळ एकाच अर्थात आर-मध्य व आर-उत्तर या प्रभाग समितीत रोमांचकार निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेसने तटस्थ राहण्याचा व्हिप काढला असला तरी या भागातील काँग्रेस नगरसेविका श्वेता कोरगावकर यांच्या विभागातील माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविका तटस्थ न राहता त्या भाजपच्या बाजुने मतदान करू शकतात. या प्रभागात शिवसेनेचे ९ ते भाजपचे ८ आणि काँग्रेसची एक नगरसेविका आहे. त्यामुळे कोरगावकर तटस्थ राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवार सुजाता पाटेकर यांचा विजय सोपा होईल. पण कोरगावकर यांनी भाजप उमेदवार आसावरी पाटील यांच्या बाजुने व्हिप नाकारुन मतदान केल्यास त्यांचेही संख्या बळ ०९ होईल आणि समासमान मतदान झाल्याने याठिकाणी चिठ्ठीने उमेदवाराची निवड करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हाट्सएपच्या द्वारे व्हीप
वैधानिक व विशेष समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला मतदान केल्याने प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल असे त्यांच्या नगरसेवकांना वाटू लागले आहे. त्यामुळे एल प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असल्याने सेनेच्या पाठिंब्यावर ही प्रभाग समिती मलिक कुटुंब घेईल याची भीती महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी सईदा खान आणि कप्तान मलिक यांना व्हाट्सएपच्या द्वारे व्हीप पाठवून या निवडणुकीत अर्ज भरू नये असे कळवले आहे.
पक्षादेश हा लेखी पत्राद्वारे पाठवला जातो. पण गटनेत्यांनी अशा प्रकारे व्हीप पाठवून मलिक यांच्या शेपटीवर पुन्हा पाय ठेवला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी गटनेत्याना सूचना करूनही त्यांनी सुधार समिती सदस्य पदी कप्तान मलिक यांना नियुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण गटनेत्यांनी मुंबई अध्यक्षांचा व्हीप मोडीत काढल्याने त्यांचा व्हीप नगरसेवकांवर बंधनकारक कसा असेल, असा सवाल कप्तान मलिक यांनी केला आहे.
कोणत्या प्रभागात कोण उमेदवार
- आर-उत्तर व मध्य प्रभाग समिती
शिवसेना : सुजाता पाटेकर
भाजप : आसावरी पाटील - आर दक्षिण विभाग
शिवसेना : एकनाथ (शंकर) हुंडारे
भाजप : लिना देहेरकर - पी/ दक्षिण
भाजप: भार्गव पटेल(बिनविरोध) - पी/ उत्तर
भाजप : दक्षा पटेल
शिवसेना: संगीता सुतार - के/ पूर्व
भाजप: अभिजित सामंत
शिवसेना: प्रियंका सावंत - के/ पश्चिम
सेना : राजू पेडणेकर
भाजप: सुधा सिंग - एच/ पूर्व- एच/ पश्चिम
सेना: प्रज्ञा भूतकर
भाजप : हेतल गाला - एफ/दक्षिण- एफ/उत्तर
शिवसेना: रामदास कांबळे
भाजप: नेहल शाह - ए, बी व ई
शिवसेना : रमाकांत रहाटे
भाजप : ऍड मकरंद नार्वेकर - सी व डी
भाजप : लीना पटेल (बिनविरोध) - जी/ दक्षिण
शिवसेना : दत्ता नरवणकर (बिनविरोध) - जी/ उत्तर
शिवसेना : टी जगदीश (बिनविरोध) - एस अँड टी
भाजप: जागृती पाटील
शिवसेना: दिपमाला बढे - एम / पश्चिम
भाजप: महादेव शिवगण (बिनविरोध) - एम / पूर्व
शिवसेना : विठ्ठल लोकरे (बिनविरोध) - एल प्रभाग
शिवसेना : आकांशा शेट्ये (बिनविरोध) - एन प्रभाग
शिवसेना : स्नेहल सुनील मोरे
भाजप: बिंदू त्रिवेदी