मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची अवघ्या ८ महिन्यात बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने पत्रक काढून अश्विनी जोशी यांना समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालकपदी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. डॅशिंग अधिकारी म्हणून अश्विनी जोशी यांची प्रशासकीय वर्तुळात ओळख आहे. एप्रिल – २०१९ रोजीच त्यांची मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीत महापालिकेत बदली करण्यात आली होती. नियमांवर बोट ठेवून काम करत असल्यामुळे अश्विनी जोशींची याआधी देखील तडकाफडकी बदली झालेली आहे. सध्या त्यांची समग्र शिक्षा अभियानात बदली केल्यामुळे एकप्रकारे त्यांना साईडलाईन केले असल्याचे बोलले जात आहे.
बदलीमागे शिवसेनेसोबतचा वाद कारणीभूत?
अश्विनी जोशी यांनी महापालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन, आरोग्य विभाग, अग्निशमन दल असे महत्त्वाचे विभाग हाताळले होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागही दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना नगरसेवक त्यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमेय गोरे यांनी जोशी यांच्यावर आविश्वास ठराव देखील आणला होता. महापालिका आयुक्तांसोबत देखील त्यांचे काहीबाबतीत मतभेद होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर अधिकाऱ्यांच्या संभाव्य बदल्यामध्ये पहिले नाव अश्विनी जोशी यांचेच होते.
अश्विनी जोशी नियमावर बोट ठेवून काम करतात. नियमांना वाकवून जे अधिकारी काम करणे पसंत करतात, ते मात्र आपल्या पदावर कायम राहतात. अश्विनी जोशी यांनी आठच महिन्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. मुंबई उपनगरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, मुंबई जिल्हाधिकारी अशा महत्वाच्या नेमणुकपदी नियुक्ती होऊनही त्यांनी आपल्या कडक शिस्तीचा बडगा दाखवला होता. राज्य उत्पादन शुल्कातही त्यांनी आयुक्तपदी काम करताना अनेक लाचखोर कर्मचार्यांना घरी पाठवले होते. तसेच बनावट दारू प्रकरणी मागील दोन वर्षात राज्याच्या महसूलात कोट्यावधींनी वाढ केली होती.