‘गेल्या २४ नोव्हेंबरला मी अयोध्येत गेलो होते. शरयू नदीकिनारी आरती केली होती. तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची मूठभर माती घेऊन गेलो होतो. मला आनंद होत आहे की त्याला वर्ष पूर्ण होण्याच्या आत हा निकाल आला आहे. येत्या २४ तारखेला मी कदाचित पुन्हा अयोध्येला जाईन. हिंदुंच्या श्रद्धेला न्याय मिळाला आहे. कुणीही कुठेही वेडंवाकडं काहीही करू नका’, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या गोंधळावर मत व्यक्त करण्याचं टाळलं. ‘आजचा दिवस आनंदाचा आहे. राजकारणावर आपण उद्याही बोलू शकतो’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
‘ओवैसी म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही’
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर यावेळी उद्धव ठाकरेंनी टीका केली. ‘ओवैसी म्हणजे काही सुप्रीम कोर्ट नाही’, अशा शब्दांत त्यांनी ओवैसींवर निशाणा साधला. ‘५ एकर जमिनीची खैरात मुस्लीम पक्षकाराने नाकारावी‘, असं ओवैसी या निर्णयावर म्हणाले होते. ‘गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं सगळ्यांनं स्वागत केलं आहे. सगळ्यांनी शांततेत आपला आनंद व्यक्त करावा’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालातले महत्वाचे मुद्दे
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला असून या निकालाच्या माध्यमातून वादग्रस्त जागेवर राम मंदिरच बनवण्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. मात्र, असं करतानाच मुस्लीम पक्षकारांना देखील अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी ५ एकरची जागा देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने सरकारला दिले आहेत.