शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना बाळासाहेबांच्या आठवणींनी गहिवरून आले. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्व अद्वितीय होते. 45 वर्ष मी त्यांच्या सहवासात राहिलो, मात्र एकही दिवस कंटाळवाणा नव्हता. ते आदर्श आहेत, दैवत आहेत. ते महाराष्ट्राचा मोठा आधार होते, असे मनोहर जोशी म्हणाले.
महाशिवआघाडी सरकारने बाळासाहेबांची प्रतिमा समोर ठेवून कामकाज करावे, त्यामुळे ते चुकू शकणार नाहीत, असे म्हणतानाच अर्थात हे उद्धव ठाकरेंना सांगायची गरज नसल्याचे जोशी म्हणाले.महाशिवआघाडीत काही वैचारिक मतभेद होतील, मात्र त्यांनी ठरवले तर वैचारिक मतभेद बाजूला ठेवता येतील. तीन पक्ष एकत्र आल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. मात्र राजकीय पक्षाने काही मुद्द्यांवर तरी एकत्र आले पाहिजे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, ही सूचना अत्यंत योग्य असल्याचे मनोहर जोशी यांनी म्हटले.
आघाडीत सामील होत असताना विचार हळूहळू बदलत आहेत. एकच भूमिका पकडून ठेऊ नये, चांगले स्वीकारत जावे, असा सल्ला मनोहर जोशी यांनी दिला. सेनेचे सरकार असावे, ही इच्छा आहे, मात्र सरकार महासेनाआघाडीचेच होईल, असा विश्वास जोशींनी बोलून दाखवला.