अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासाठी गेल्या काही दिवासांपासून भाजपनं मोर्चेबांधणी केली असतानाच आता खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच अर्णब गोस्वामी यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यपालांनी थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून माहिती घेतली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षेबद्दल आणि प्रकृतीबद्दल राज्यपालांनी काळजी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. अर्णब गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालायात जामिनासाठी अर्ज केला आहे. शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांना अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते.
Maharashtra Governor BS Koshyari spoke to State Home Minister Anil Deshmukh & conveyed to him his concern over the security and health of Republic TV Editor Arnab Goswami. He also asked the Home Minister to allow Goswami's family to see him and to speak to him: Raj Bhavan pic.twitter.com/ctTpWdsSIt
— ANI (@ANI) November 9, 2020
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली आहे. अर्णब यांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची परवानगी देण्याबाबत देखील राज्यपालांनी अनिल देशमुखांना सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितिन सारडा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये या तिघांची नावं घेतली होती. अर्णब गोस्वामींनी रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ बनवण्याचं कंत्राट अन्वय नाईक यांच्या कंपनीला दिलं होतं. त्यापोटी ६ कोटींचं बिल झालं. मात्र, यातले तब्बल ८३ लाख रुपये द्यायला अर्णब यांनी नकार दिल्यामुळे आत्महत्येचं पाऊल उचलावं लागल्याचं अन्वय नाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच, नितीन सारडा आणि फिरोज शेख यांनी देखील पैसे थकवल्याचं नमूद केलं आहे. त्या प्रकरणी अर्णब गोस्वामी गेल्या ५ ते ६ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.