बेस्ट प्रशासन फेब्रुवारी महिन्याचे वेतन आता 30 मार्च रोजी देणार असल्याच्या निर्णयाविरोधात बेस्ट कामगारांनी बीएमसी आणि बेस्ट प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून झाली आहे. स्थानकाबाहेर बेस्ट कर्मचारी शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहून हातात बीएमसी आणि बेस्ट प्रशासनाविरोधातील फलक घेऊन आंदोलन करत होते.
बेस्ट कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाही. फेब्रुवारी महिन्याचे वेतन 30 मार्च रोजी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात बेस्ट कर्मचार्यांनी संताप व्यक्त करत शुक्रवारपासून बेस्ट आणि मुंबई महापालिकाविरोधात नवीन लढाई सुरू केली. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गेट नंबर २ पासून झाली आहे. ही लढाई अशी सुरु राहणार असल्याची माहिती बेस्ट वर्कर्स युनियनकडून देण्यात आली आहे. मुंबई शहराच्या दृष्टिने महत्वाच्या ठिकाणी असलेल्या या जमिनींवर डोळा ठेवून बेस्ट उपक्रम संपविण्याचे षडयंत्र राजकारणी, बिल्डर्स, विकासक यांच्याकडून रचले जात आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टिने महत्वाची असलेली आणि मुंबई शहराच्या प्रतिष्ठेची असलेला बेस्ट उपक्रम पुरवित असलेली प्रवासी वाहतूकसेवा चालवली पाहिजे, ती बससेवा सुरळीत चालण्यासाठी तिची आर्थिक जबाबदारी मुंबई महानगरपालिकेला घेण्यास भाग पाडले पाहिजे आणि या बससेवेसाठी अहोरात्र मेहनत करणार्या बेस्ट कर्मचार्यांना त्यांचे वेतन वेळेवर मिळाले पाहिजे यासाठी प्रत्येक मुंबईकर नागरीकाने प्रयत्नशील असले पाहिजे.
या बससेवेचे खासगीकरण रोखले पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने दैनंदिन प्रवासासाठी अत्यावश्क असलेली ही सुरक्षित बससेवा राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे लयास जाणार असेल तर त्या विरोधात प्रत्येक नागरिकाने आपला आवाज उठवला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनतेत जाऊन याबद्दल पत्रके वितरीत करित आहोत, सोबत साक्षरी मोहीमसुद्धा सुरू केली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अरविंद कागिनकर यांनी दिली.