घरताज्या घडामोडीपरिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं, आशिष शेलार यांची टीका

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं, आशिष शेलार यांची टीका

Subscribe

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी आज सकाळी मुंबई पोलीस आयुक्तांची ही भेट घेतली. त्यापुर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. मात्र शासनाने कोणताच निर्णय घोषित केला नाही. तसेच ग्रामपंचायतींनी १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतल्याने गेले तीन दिवस चाकरमानी कोकणाकडे जाण्यासाठी धडपड करीत आहे. एक तर ई पास मिळत नव्हते, ज्यांना पास मिळाले त्यांच्या रांगा कशेटी घाट आणि खारेपाटण मध्ये लागल्या होत्या. अन्न, पाण्याशिवाय चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. तर आता दोन दिवस प्रवासाचे शिल्लक असताना आज शासनाने निर्णय घोषित केला.

आज पासून एसटीचे बुकिंग सुरू होणार असेल तर मग कसा प्रवास होणार? १० दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला तरी ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा निर्णय घेतला त्या विषयी शासनाच्या प्रतिनिधीची स्थानिकांशी चर्चा केली आहे का? रेल्वे गाड्या सोडण्यास तयार होती मग गाड्या का मागण्यात आल्या नाही? एसटीने जाणार त्या़ंना ई पास नाही मग खासगी गाडीसाठी का? शासनाने १० दिवस क्वारंटाईन असे घोषित केले आणि ग्रामपंचायतीने ते मान्य न केल्यास काय करणार? आता एकाचवेळी एसटी आणि खासगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय? केवळ २५० रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या मोफत टेस्ट शासनाने का केल्या नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच शासनाला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोडं असल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशा शब्दात आमदार अँड आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -