मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात लागू असून पाण्यासाठी जनतेची पायपीट सुरु असतानाच महापालिका प्रशासनाने पाण्याच्या शुल्कात अडीच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाण्याच्या दरात प्रति हजार लिटरमागे सुमारे १५ पैशांनी वाढ होणार आहे. या शुल्कवाढीमुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २८ कोटींचा महसूल जमा होणार आहे. याबाबत प्रशासनाने माहितीकरता सादर केलेल्या निवेदनाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. ‘मुंबईकरांना आधी मुबलक पाणी द्या,नंतरच पैसे वाढवा’, असे सांगत त्यांनी विरोध केला. परंतु या विरोधानंतरही समिती अध्यक्षांनी याला मंजुरी दिली. त्यामुळे येत्या १६ जूनपासून याची आकारणी केली जाणार आहे.
का वाढलं पाणीशुल्क?
महापालिका जलअभियंता खात्याच्या आस्थापना, प्रशासकीय खर्च तसेच प्रचालन, परिरक्षण व विद्युतसह शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पट्टी यांच्या एकत्रित खर्चाच्या प्रत्यक्ष वाढीच्या परंतु ८ टक्क्यांपेक्षा अधिक नसेल एवढा जलआकार वाढवण्यास स्थायी समितीने ९ मे २०१२मध्येच परवानगी दिली आहे. स्थायी समितीने प्रत्येक वर्षी हा जलआकार वाढवण्यास मंजुरी दिलेली असल्याने जलअभियंता विभागाच्या वतीने येत्या १६जून २०१९पासून याची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माहितीकरता विभागाने हा प्रस्ताव समितीपुढे सादर केला होता.
हेही वाचा – मुंबईत पाणीकपात लागू केलीत, पण पाणी गळतीचं काय?
किती वाढलं पाणीशुल्क?
मागील वर्षी आस्थापन, प्रशासकीय, विद्युत तसेच शासकीय धरणांतून उपसा करणार्या पाणी पट्टीसाठी ८३६.६० कोटी रुपये खर्च झाले होते. तर चालू वर्षी हा खर्च ८५७.३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेते २.४८ कोटी रुपये एवढा खर्च वाढत असल्याने तेवढा जलआकार वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हजार लिटरमागे सध्या ३.८२ पैसे आकार आणि त्यावर ७० मलनि:सारण आकार घेतला जातो. त्यात वाढ होऊन निवासी वापरासाठी ३.९१ पैसे आणि त्यावर ७० टक्के मलनि:सारण आकार लावला जाणार आहे. त्यामुळे कमीत कमी हजार लिटरमागे १५ पैसे ते सुमारे ६ रुपयांनी वाढ होणार आहे.