‘न भूतो…’अशा दहा दिवसांमध्ये तब्बल सहा बैठकांचे आयोजन करत महापालिकेच्या स्थायी समितीने इतिहास रचला आहे. दोन मुख्य सभा आणि चार तहकूब सभा अशा एकूण सहा स्थायी समितीच्या बैठका पार पडल्या आहेत. या सर्व बैठकांमध्ये तब्बल ३२० प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. सलग चार दिवस स्थायी समितीच्या सभा घेऊन तसेच दहा दिवसांमध्ये एकूण सहा बैठका घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विक्रम केला आहे. यापूर्वी रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यशोधर फणसे यांच्या कारकिर्दींमध्ये मूळ सभेसह एक ते दोन तहकूब सभा घेण्यात आल्याच्या नोंदी आहेत.
दहा दिवसांमध्ये तहकुबीसह तब्बल ६ बैठकांचे आयोजन
विधान सभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या धसक्यामुळे मुंबईतील विकास कामांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची स्पर्धाच लागली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची पहिली सभा ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. त्यानंतर बुधवारी ११ सप्टेंबर रेाजी पुन्हा तहकूब सभा आयोजित करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीची नियमित सभा १६ सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. १७ ते १९ सप्टेंबर, असे सलग तीन दिवस तहकूब सभांचे आयोजन करण्यात आले. त्यात २७० विकास कामांचे आणि विविध करांसह २ हजार २२५ कोटी रुपयांच्या कंत्राटी कामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीची बैठक आठवड्यातून एक होणे बंधनकारक आहे. त्यानुसार दोन आठवड्यांमध्ये दोन नियमित सभा घेऊन चार तहकूब सभा घेण्याचा रेकॉर्ड रचला गेला. सहा सभांमध्ये २७० प्रस्ताव पटलावर मांडले गेले असले तरी शुक्रवारी ६ सप्टेंबरची नियमित सभा अरुण जेटली यांच्या निधनामुळे तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे त्या बैठकीतील ५४ विषय ०९ सप्टेंबरच्या नियमित सभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे एकूण सुमारे ३२० प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आले.
हेही वाचा – शाळांच्या देखभाल, स्वच्छतेसाठी निविदा न काढताच कंत्राट
विधान सभा आचारसंहितेच्या कारणांमुळे विविध विकास कामांना मंजुरी देता येणार नाही. परिणामी भविष्यात अनेक विकास कामे रखडतील. त्यामुळे मुंबईकरांचे हित लक्षात घेता या विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले होते आणि स्थायी समितीने जनतेचे हित लक्षात घेता त्याला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावांवर जर विरोधी पक्षांसह इतर कोणी सदस्य बोलले नाहीत तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु, आपण प्रत्येक प्रस्तावावर बोलण्याची संधी सदस्यांना देत होतो, असे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका चिटणीस विभागातील निवृत्त अधिकार्यांच्या मते आजवर नियमित सभेसह केवळ एक ते दोन सभा आचारसंहितेच्या काळात झाल्या होत्या. यापूर्वीचे रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यशोधर फणसे यांच्या कारकिर्दीत जेवढ्या बैठका झाल्या नाहीत, तेवढ्या बैठका यशवंत जाधव यांनी घेतल्या. दहा दिवसांमध्ये सात सभा घेत त्यांनी इतिहास रचला.
सात सभांसाठी चिटणीस विभागांची सेवा दिवस-रात्र
सात सभांसाठी येणारे प्रस्ताव पटलावर ठेवण्यासाठी महापालिका चिटणीस विभागातील स्थायी समिती कक्षाचे कर्मचारी आणि अधिकार्यांना दिवस-रात्र सेवा बजवावी लागली. अहोरात्र सेवा करत त्यांनी तातडीने हे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पटलावर ठेवले. दरदिवशी मंजूर होण्यार्या प्रस्तावांचे तातडीने कार्यादेश देण्यासाठी मंजुरीची पत्रेही देण्याचे काम चिटणीस विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने करून स्थायी समितीच्या या रेकॉर्डब्रेक सभेचे कामकाज सुकर करण्यासाठी प्रयत्न केले.
- ०६ सप्टेंबर २०१९ : ५४ विषय
- ९ सप्टेंबर २०१९ : १९ सह ९९ जादा विषय
- ११ सप्टेंबर २०१९ : जादा ५८ विषय (तहकूब सभा)
- १६ सप्टेंबर २०१९ : ४५ विषय
- १७ सप्टेंबर २०१९ : जादा ३० विषय
- १८ सप्टेंबर २०१९ : ११ जादा विषय
- १९ सप्टेंबर २०१९ : २६ जादा विषय
मंजूर करण्यात आलेले विकास प्रकल्प
- शीव रुग्णालय परिसरातील इमारतींचे बांधकाम : ५४३ कोटी रुपये
- वांद्रे भाभा रुग्णालय विस्तारीकरण : २०६कोटी रुपये
- तानसा जलवाहिनी लगत सायकल ट्रॅकचे बांधकामे : १२२ कोटी रुपये
- शताब्दी रुग्णालयाच्या बोरसा पाडा येथे बांधकाम : ९९ कोटी रुपये
- भायखळा येथे दादोजी कोंडदेव मार्ग येथे पर्जन्य जलवाहिनी : ६० कोटी रुपये
- मालमत्ता कराकरता अत्याधुनिक विश्लेषण तंत्राची प्रणाली : ६५ कोटी रुपये
- कापूरबावडीतील विविध आकारांच्या जलवाहिन्यांना गंजप्रतिरोधक रंगकाम : ५० कोटी रुपये
- महापालिका शाळांमध्ये स्वच्छता सुरक्षा आणि देखभाल दुरुस्ती कंत्राट: ३२ कोटी रुपये
- अतिक्रमण निर्मुलन विभागांसाठी क्रेनची भाडे तत्वावर सेवा : ४२ कोटी रुपये
- भांडुप अँकर ब्लॉक ते मरोशी गेट विविध व्यासाच्या जलवाहिनी बदलणे : ३६ कोटी रुपये
हेही वाचा – महापालिका कर्मचार्यांना यंदाही १५ हजार रुपये दिवाळी बोनस!