उन्हाळा सुरू झाला की मुंबईकर रेल्वेस्थानकांवरील लिंबूपाणी पिण्यासाठी धाव घेतात. असाच एक व्हीडिओ कुर्ला स्थानकातील समोर आला आहे. ज्यात अशा स्टॉलवर लिंबूपाणी कसं बनवलं जातं, याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे स्टॉलचा माणूस अक्षरश: हात धुवून लिंबूपाणी तयार करत आहे. पण तो हात बाहेर नाही, तर चक्क त्या लिंबूपाण्यातच धुवत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे आता मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शीतपेये तयार करताना अशुद्ध पाण्याचा वापर केला जात असल्याचं उघड झाल्यामुळे या पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठीच मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत सोडामिश्रित शीतपेयं, रस्त्यावरील सरबत, बनावट फळांचे रस यांची तपासणी मोहीम पालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे अधिकारी सोडामिश्रित शीतपेये, रस्त्यावरील सरबत, बनावट फळांचे रस यांची तपासणी करत आहेत.
पालिका अधिकाऱ्यांकडून मोहिम राबवली
कुर्ला स्थानकात अस्वच्छ टाकीतील पाण्याने लिंबू पाण्याचा व्हीडिओ समोर आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरील लिंबूपाणी आणि काला खट्टा विकण्यावर बंदी घातली. पण, आता मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही मोहिम राबवली जात आहे. याविषयी अधिक माहिती देताना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं की, ‘‘पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही मोहिम राबवली जात आहे. लिंबूसरबत अस्वच्छ परिस्थितीत बनवले जात असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व भागात रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या शीतपेयांची तपासणी पालिकेने सुरू केली.’’
ई-कोलाय हा घातक जीवाणू
तसेच, प्रत्येक वॉर्डमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी फिरत असते. त्यामुळे ते अधिकारी आता विशेषत: फक्त लिंबूसरबत बनवणाऱ्या विक्रेत्यावर नजर ठेवून असणार आहे. रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या शीतपेयांसाठी अनेकदा हे पाणी अस्वच्छ असतं. त्यामुळे, यामध्ये ई-कोलाय हा घातक जीवाणू आढळून येण्याची शक्यता असते. या पाहणीत दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे आणि पाण्याचे नमुने ही घ्यायला सांगितले असल्याचं डॉ. केसकर यांनी सांगितलं.