मध्य रेल्वेकडून वारंवार आवाहन करुनही या मार्गावर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे या घटनांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोहीम सुरू केली आहे. फुकट्या प्रवाशांविरुद्ध एप्रिल ते जुन महिन्यामध्ये कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये मध्य रेल्वेने तब्बल ५९ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
३ महिन्यात १० लाख ८५ हजार गुन्ह्यांची नोंद
मध्य रेल्वे प्रशासनाने एप्रिल ते जुन या तीन महिन्यात फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण १० लाख ८५ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत ९ लाख ८३ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यावरुन फुकट्याने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. तर, एप्रिल ते जून महिन्या दरम्यान, ५९ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दुसऱ्यांना तिकीट देणाऱ्यांवर ३९१ गुन्ह्यांची नोंद
जून महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत ३ लाख २६ गुन्ह्यांमध्ये १७ कोटी २० लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. आपले आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणाऱ्या ३९१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
फुकट्यांची आकडेवारी
कालावधी फुकट्यांची संख्या वसुल करण्यात आलेला दंड
एप्रिल ते जून १८ १० लाख ८५ हजार ५९ कोटी ३६ लाख रु
एप्रिल ते जून १७ ९ लाख ८३ हजार ५४ कोटी रु.
जून १८ ३ लाख २६ हजार १७ कोटी २०लाख रु
जून १७ २ लाख ५८हजार १२ कोटी ७८ लाख रु.