पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केमिकल हल्ला करणाची धमकी देणार्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव काशिनाथ गुनाधार मंडल असून तो झारखंडचा रहिवाशी आहे. त्याचा जातीय दंगली घडवण्याचा कट होता, अशी माहिती त्याच्या चौकशीत उघड झाली आहे.
काशिनाथकडून पोलिसांनी दोन मोबाईल आणि दोन सिमकार्ड जप्त केले असून त्यापैकी एका मोबाईलवरुन त्याने धमकीचा कॉल केला होता. नवी दिल्ली येथे एनएसजीचे एक मुख्य नियंत्रण कक्ष आहे. शुक्रवारी 27 जुलैला तिथे काही अधिकारी आपले काम करीत होते. याच दरम्यान त्यांना एक कॉल आला होता. कॉल करणार्या व्यक्तीने स्वतचे नाव सांगितले नाही, मात्र आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केमिकल हल्ला होणार आहे.
या हल्ल्यानंतर देशभरात जातीय दंगली उसळणार, मोठे आर्थिक नुकसान होणार अशी धमकी त्याने दिली होती. या धमकीचा कॉल वरिष्ठांना समजताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली होती. केंद्रीय सुरक्षा अधिकार्यांनी कॉल करणार्या व्यक्तीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला, काही तासांत या अधिकार्यांना हा कॉल मुंबईतील चर्नीरोड परिसरातून आल्याचे समजले. ही माहिती दिल्ली पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी शेअर केला.
पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनीही या कॉलची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला तपासाचे आदेश दिले होते. कॉलचे लोकेशनचा शोध सुरु असतानाच ही व्यक्ती मुंबई सेंट्रल परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर काही क्षणांतच पोलिसांच्या एका विशेष पथकाने मुंबई सेंट्रल परिसरात शोधामोहीम सुरु करुन शनिवारी सायंकाळी काशिनाथला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असलेल्या काशिनाथची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने बोलताना सांगितले.