मुंबईमध्ये लहान मुलांकडून कामं करुन घेतली जातात. परराज्यातून बालकामगारांची तस्करी करुन त्यांना मुंबईमध्ये आणले जाते आणि त्यांच्याकडून काम करुन घेतली जातात. बिहार आणि नेपाळमधील किशोरवयीन मुलांना मायानगरीत आणून मजुरीच्या कामाला जुंपले जात असल्याचे धक्कादायक वास्तव शनिवारी उजेडात आले. ठाणे रेल्वे पोलीस आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारामुळे १७ बालकांची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून एका ट्रेनमधून या मुलांना आणण्यात आले होते. ठाणे रेल्वे पोलीस, प्रथम संस्था आणि सलाम बालक यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत या बालकांची सुटका करण्यात आली आहे. या बालकांना मुंबईतील धारावी, नागपाडा येथील चामडयाच्या उद्योगाच्या कामासाठी आणण्यात आल्याचे समोर आले आहे. बिहार आणि नेपाळमधून अनेक बालक आणून त्यांना चामडयाच्या कामासाठी जुंपले जातात. सुटका करण्यात आलेल्या या बालकांना उल्हासनगरच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.