कानडी राजकारणाचा मुंबईत तमाशा सुरू असताना या प्रकरणात नवा खेळ सुरू झाला आहे. कर्नाटकमधल्या बंडखोर आमदारांनी मुंबईत तळ ठोकल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या डी. के. शिवकुमार यांना आता पोलिसांनी जबरदस्तीने परत कर्नाटकला पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी लावलेल्या सेक्शन १४४ अर्थात संचारबंदीच्या नोटिशीचं त्यांनी उल्लंघन केल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांची रवानगी थेट कर्नाटकला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मुंबई विमानतळावर पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, या आमदारांना भेटण्यासाठी निघालेल्या मिलिंद देवरा, नसीम खान आणि सूरजसिंह ठाकूर यांना पोलिसांनी काही वेळासाठी ताब्यात घेऊन कलिना येथील गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं होतं. आता त्यांची पोलिसांनी सुटका केली आहे.
काय घडतंय नक्की?
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-जदसे आघाडीचं सरकार आहे. या सरकारमधल्या १३ मंत्र्यांनी अचानक राजीनामा देत थेट मुंबईतल्या सोफी हॉटेलमध्ये धाव घेतली. मंगळवारी रातोरात त्यांना सोफीटेलमधून रेनेसान्समध्ये हलवण्यात आलं. मात्र, तिथे देखील कोणत्याही काँग्रेस नेत्याला त्यांना भेटू दिलं जात नाहीये. पोलिसांच्या कडक पहाऱ्यामध्ये या आमदारांना ठेवण्यात आलं आहे. या आमदारांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकमधली काँग्रेसप्रणीत सरकार अल्पमतात आल्यामुळे सरकार कोसळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंडखोर आमदारांना सामावून घेण्यासाठी या आमदारांच्या राजीनाम्याच्या तिसऱ्याच दिवशी कर्नाटकच्या संपूर्ण मंत्रिमंडळानंच राजीनामा दिला. मात्र, अजून देखील या बंडखोर आमदारांची भूमिका बदललेली नाही. यादरम्यान, कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या आमदारांपैकी ७ आमदारांचे राजीनामे विहीत नमुन्यात नसल्यामुळे परत पाठवले असून त्यांना पुन्हा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जदसे आघाडीला सरकार वाचवण्यासाठी अजून एक दिवस मिळाला आहे. हीच संधी साधण्यासाठी कर्नाटक सरकारचे तारणहार डी. शिवकुमार मुंबईत दाखल झाले होते. मात्र, त्यांना देखील या आमदारांना भेटू देण्यात आलेले नाही.
मुंबई पोलिसांनी मला इथून जाण्याची विनंती केली. मला माझ्या आमदारांना भेटायचं होतं आणि त्यांचं मत ऐकायचं होतं. संविधानाने मला तो अधिकार दिला आहे. परंतु पोलिसांनी मला परत जाण्यास सांगितले आहे. म्हणून मी बेंगलोरला परत जात आहे.
डी. शिवकुमार, नेते, काँग्रेस
दरम्यान, रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांनी थेट मुंबई आयुक्तांनाच पत्र लिहत ‘आमच्या जिवाला धोका असून त्यामुळे आम्हाला कुणाला भेटायचे नाही’, अशी विनंती केली आहे.