कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या सात महिन्यांपासून बंद असणारी लोकल कोरोनादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत होती. यानंतर लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान लवकरच मुंबईकरांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे चिन्हे दिसताय. लोकलने सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Dear Sir @CMOMaharashtra @OfficeofUT
Earlier Women allowed to travel in Mumbai Locals. Now Lawyers allowed too. Why disallow businessmen employees common man❓ Its BIG INJUSTICE to block @mumbairailusers in Diwali season.@PiyushGoyal @AUThackeray @VijayWadettiwar @DrSEShinde pic.twitter.com/TeaiOEe3Qd
— M. K. Ludhwani (@m_ludhwani) October 27, 2020
“याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे” , असे ट्विटरवर लिहित एका प्रवाशाने आपली खंत व्यक्त केली आहे. यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी वरील माहिती दिली.
We will take decision on starting local train services for all in the next couple of days. We have held discussions with various stakeholders. Mumbaikar will get relief on this soon
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 27, 2020
याआधी विजय वडेट्टीवार यांनी महानगर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली होती.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
मुंबईत महिलांसाठी लोकल प्रवास विशिष्ट वेळेत सुरू झाल्यानंतर आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तरात ही माहिती दिली. ‘हा निर्णय लगेच होणार आहे. पुढच्या २-३ दिवसांत यासंदर्भातल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. यासाठी सगळ्या संघटनांशी चर्चा करत आहोत. त्यासंदर्भात गाड्यांची संख्या, प्रवाशांची संख्या यांचा अंदाज घेत आहोत. मुंबईकरांना या निर्णयासाठी फार वाट पाहावी लागणार नाही. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळ्या वेळा असतात. असंघटित क्षेत्रासाठी कामाच्या वेळा वेगळ्या असतात. त्यासंदर्भात आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यावेळी उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांना खुली करण्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीत टप्प्याटप्प्याने लोकांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.