२०१९च्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेनेविरोधातील लोकमत पाहाता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी या दोन्ही पक्षांच्या आघाडीसोबतच इतर पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी होऊ शकते का? याची चाचपणी सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रोसमधील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात आणि विशेषत: मुंबईत मनसेला सोबत घ्यावे का? असा मुद्दा चर्चेला आल्यानंतर काँग्रेसमधीलच काही ज्येष्ठ नेतेमंडळींना याला कडाडून विरोध केला. विशेषत: काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यामुळे काँग्रेसचेच मोठे नुकसान होईल अशी शक्यता वर्तवली आहे.
निरुपमांना नकोत राज ठाकरे!
भाजपविरोधात मोठी फळी उभारण्यासाठी विरोधातील सर्वच पक्षांची आघाडीसाठी पडताळणी सुरू झाली आहे. यानुसार हालचालीही सुरू झाल्या आहेत. मुंबईत सत्ताधाऱ्यांना आणि विशेषत: शिवसेनेला शह द्यायचा असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मनसे हा उत्तम पर्याय मानला जात आहे. त्याच अनुषंगाने मनसेला सोबत घ्यायचे की नाही? या विषयावर संबंधित बैठकीत चर्चा झाली. मात्र, मनसेला सोबत घ्यायला संजय निरूपम यांनी तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील महत्त्वाचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्याला काँग्रेसमधून विरोध करण्यात आला.
तुम्ही हे वाचलंत का? – उत्तर भारतीय ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण मिळावे – संजय निरुपम
उत्तर भारतीय मतदारांसाठी विरोध
मनसे आणि राज ठाकरेंना विरोध करण्यामागे प्रामुख्याने मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना काँग्रेसने केंद्रस्थानी ठेवले आहे. ‘उत्तर भारतीय मतदार ही काँग्रेसची परंपरागत व्होटबँक आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारांनी भाजपला मत दिलं होतं. मात्र, या निवडणुकीत सरकारविरोधी वातावरण लक्षात घेता हा मतदार काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरेंना सोबत घेतलं, तर उत्तर भारतीय मतदार नाराज होईल आणि त्याचा फायदा पुन्हा भाजपलाच होईल’, अशी शक्यता संजय निरुपम यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.