मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासियांना कोरोनावरील लसीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र सध्या लस ही अगदी कमी प्रमाणात उपल्बध होणार असून या लसीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लस कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्रात आल्यावर ती सुरक्षित रहावी अथवा ती चोरीला जाऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी लसीचा साठा ठेवण्यात येणार आहे, त्याठिकाणी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांमुळे सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. मात्र आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू प्रकार आढळून आल्याने अवघे जग सावध झाले आहे. त्यातच मुंबईत ब्रिटनवरून आलेल्या ८ प्रवाशांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आलेला आहे.
टप्प्याटप्प्याने होणार लसीकरण
मुंबईची लोकसंख्या आणि उपलब्ध लसीचा साठा पाहता लसीकरण टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. पालिकेने लसीकरणाचा प्राधान्यक्रमही ठरवला आहे. लस ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्याप्रमाणे ती लस कोरोना योद्धे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामान्य नागरिक यांना देण्यात येणार आहे.
आता कोरोनाच्या कालावधीत जीवनदान ठरणाऱ्या लसीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लसीचा साठा कांजूरमार्ग व अन्य लस साठवणूक केंद्रात ठेवण्यासाठी आल्यावर ती सुरक्षित रहावी अथवा ती चोरीला जाऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी लस चोरीला जाऊ शकते, यास दुजोरा दिला आहे; मात्र पालिकेने त्यासाठी सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेतली असून ज्या ज्या केंद्रात लस ठेवण्यात येईल, तेथे तेथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.