नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारी देखील वाढत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सीबीडी येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आज २०१९ मधील ‘वार्षिक गुन्हे आढावा’ देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या आढावा परिषदेत नवी मुंबईतील गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महिला अत्याचार, सायबर क्राईम आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत विक्रमी वाढ झाल्याने नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था आबाधित राखून गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर आहे.
‘नवी मुंबई शहरात गेल्या वर्षभरात मालमत्ता, अपघात अशा गुन्ह्यांत घट झाली असली तरी २०१८ पेक्षा त्यात ७२ गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. यात महिलांविरोधातील आणि फसवणुकीच्या तसेच सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच गुन्हे शाबिती म्हणजे आरोपींचा दोष सिद्ध करण्याच्या संख्येमध्ये देखील वाढ झाली आहे’, अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. २०१८ पेक्षा २०१९ ला ७२ गुन्हे वाढले आहेत. सायबर गुन्हे, तसेच महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. यात महिला अत्याचाराचे ६०२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ५८७ गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. यात बलात्काराचे १६९ गुन्हे दाखल असून १६६ गुन्हे उघडकीस आले आहेत. यात १११ बलात्कार हे ओळखीच्या मित्र आणि नातेवाईकांकडून झाले आहेत. फक्त एक बलात्कार हा अनोळखी इसमाकडून झाला आहे, तर विनयभंगाचे २५१ गुन्हे दाखल झाले होते. त्यात २३९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींत ४ पट वाढ
२०१९ ला सायबर गुन्ह्यांत वाढ झाली असून, ६२ गुन्हे दाखल झाले आहेत. यात ऑनलाईन पेमेंट आणि ओटीपी शेअर केल्याने आर्थिक फसवणूक झाली आहे. सायबर सेलकडे ४१७ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ३५४ अर्जांची प्रकरणं निकाली काढली आहेत. २०१८ च्या तुलनेत सायबर सेलमध्ये चार पट तक्रारी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे दोषसिद्धीचा रेट देखील वाढला आहे. यात बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, पोक्सोसारख्या गुन्ह्यांचा आरोपी शोधून त्याच्यावर दोष सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने ७५ गुन्ह्यांमध्ये १६४ आरोपींना अटक केली आहे. तर २०१९ ला फरारी असेलेले १११ आणि वाँटेड आरोपी २५५ अशा ३६६ आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कारवाईत १५४ गुन्हे दाखल होते. यात २४५ आरोपी अटक असून २.८ कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.