बदलापूरपासून सुमारे आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावामागच्या वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळून आला आहे. या बिबट्याचा मृत्यू दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज बदलापूरचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याचे हात पाय नखे आणि दात सर्व गोष्टी जशाच्या तशा असल्याने हा बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र वैद्याकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल. तसेच बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने त्याचा भुकेमुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. अर्थात मृतदेह सडलेला असल्याने नेमके कारण समजण्यास उशीर होणार आहे.
नेमके काय घडले?
बदलापूरजवळील तानवाडी, चामटोली कोंडेश्वर याभागात बिबट्या आणि त्याचे दोन बछडे दिसत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे आल्या होत्या. मात्र वनविभागाच्या कॅमेऱ्यात हा बिबट्या कधीच दिसला नव्हता. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बिबट्याचा या भागात संचार आहे. मात्र बिबट्या न आढळल्याने नक्की बिबट्याच्या या भागातील आश्रयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र बुधवारी थेट बिबट्याचा मृतदेह आढळल्याने त्यांच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शवविच्छेदनासाठी बिबट्याचा मृतदेह ठाणे येथील वनसंरक्षक कार्यालयात पाठविण्यात आला आहे. तिथून पुढील कार्यवाही होणार आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण त्यानंतरच स्पष्ट होईल असे बदलापूरचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ यांनी सांगितले आहे.