नोव्हेंबर संपत आला तरी मुंबईकरांना हवी तशी थंडी पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईकरांना थंडीची प्रतिक्षाच करावी लागत असून, दोन दिवसांपासून तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली आहे. उपनगर आणि महानगर परिसरात काही ठिकाणी पारा २० अंशाच्या खाली गेला आहे. तर गेल्या दहा दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पारा चांगलाच खाली उतरला असला तरी राज्यभरात महाबळेश्वर वगळता कमाल तापमान जवळपास ३० अंश किंवा अधिकच राहिले असल्याचे समोर आले आहे.
किमान आणि कमाल तापमान
गेले काही दिवस मुंबईतील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश राहिले असून किमान तापमान २४ ते २५ अंशाच्या आसपास होते. मंगळवारपासून किमान तापमान २४ ते २५ अंशाच्या आसपास होते. मंगळवारपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील केंद्रावरील नोंदीनुसार बुधवारी सकाळी २१.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे २३ अंश सेल्सिअस, असे किमान तापमान नोंदविण्यात आले आहे.
तसेच बोरीवली, पवई आणि महानगर प्रदेशात पनवेल परिसरात काही ठिकाणी पारा २० अंशाच्या खाली उतरल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर कमाल तापमान २८-२९ अंशापर्यंत खाली आले तर हिवाळा सुरु झाला, असे म्हणता येईल असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे उत्तर पूर्व वारे वाहायला लागले की अधिक गारवा येईल.
हेही वाचा – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार, पण सत्तास्थापना अजूनही लांबच!