मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेरील पूल कोसळल्यानंतर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेवरील अनेक पुल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल चालतानाही अक्षरश: हादरे बसत आहेत. त्यामुळे या पुलावरून नागरिक जीव मुठीत घेऊन चालतात.
बंद केेलेला पूल पुन्हा सुरु केला
एल्फिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून धोकादायक पूलांची पाहणी करून ऑडीट करण्यात आले होते. त्यावेळी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाची पाहणी करून हा पूल काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. मात्र काही दिवसानंतर हा पूल पून्हा सुरू करण्यात आला. हा पूल पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेकडील स्कायवॉकला जोडण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी संध्याकाळी दोन लोकल आल्यानंतर पूलावर प्रवाशांची खूपच गर्दी होते. त्यावेळी पुलावरून चालताना पूल अक्षरश: हालत असल्याचे प्रवाशांचे म्हणणं आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुज्जी करणे महत्वाचे आहे.
वेळीच लक्ष घालून दुरुस्ती करावी
हा पूल जुना आणि अरूंद असल्याने गर्दीच्यावेळी नवीन पुलाचा वापर करावा असे फलकही पुलावर लावण्यात आले आहे. मात्र एखादी दुर्घटना घडल्यानंतर डोंबिवलीकरांनी केवळ श्रध्दांजली व्हायची का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्यामुळे सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर डोंबिवलीचा धोेकादायक पूलाचा प्रश्नही पून्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याअगोदर रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली पाहिजे, अशी मागणी डोंबिवलीकर प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा –