कमी कालावधीत प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, ‘या मालिकेचे शेवटचे काही भाग दाखवू नयेत’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. डॉ. अमोल कोल्हेंनी ही मागणी स्वीकारल्याची चर्चा काही दिवसांपासून चालू होती. मात्र, ही अफवा असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अर्जुन खोतकर यांनी केलेल्या मागणीवर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे आणि काय वगळायचे हा निर्णय झी मराठी वाहिनीचा असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. “मागील दोन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. अत्यंत जबाबदारीने आणि नैतिकतेने झी मराठी वाहिनी तसेच जगदंब क्रिएशन्सने ही मालिका केली आहे. अर्जुन खोतकर यांच्या भावनेविषयी मला आदर आहे. परंतु मालिकेचे चित्रीकरण करतानाच याची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही”, असे त्यांनी या व्हिडिओत सांगितले आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका अडिच वर्षे सुरू असताना @JagdambCreation @zeemarathi वाहिनीने जबाबदारीने, नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केलीय काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती. pic.twitter.com/0Mvgbj63Ht
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 22, 2020
का केली शेवटचे भाग वगळण्याची मागणी?
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांना औरंगाजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे यानंतरची दृश्य पाहणे आता मनाला पटण्याजोगे नाही, त्यामुळे ही दृश्य वगळण्यात यावीत अशी विनंती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मालिकेतील शेवटचे काही भाग वगळण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अखेर त्यावर पडदा पडला आहे.