रायगड जिल्ह्यात सुक्या मासळीची आवक घटल्याने मासळीचे भाव वाढले आहेत. अलिबाग, पोयनाड , दासगाव, म्हसळा, महाड येथे बाजारात सुकी मासळी खरेदी करण्यासाठी सध्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. परंतु भाव कडाडल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. पावसाळ्यात मांसाहार करणारया खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचे काम सुकी मासळी करत असते . त्यामुळे मे महिन्यात सुक्या मासळीला मागणी वाढते.
समुद्रकिनारी खास तयार केलेल्या अंगणात ऊन्हामध्ये ओली मासळी सुकवली जाते. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगतच्या कोळीवाड्यामध्ये ओटयांवर मासळी सुकवण्याची लगबग सध्या सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा सुक्या मासळीचा बाजार असाच सुरू राहतो. त्यातून कोटयवधींची उलाढाल होत असते. पोयनाड , दासगाव , म्हसळा येथील सुक्या मासळीच्या बाजारात सध्या मासळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
सोडे, अंबाड, वाकटी, पाकट, बोंबील, सुका जवळा, मासे सुकट, माखली आणि खारा बांगडा असे अनेक प्रकार सुक्या मासळीत मिळतात. वाकटी 600 रुपये किलो, बोंबील 600 रुपये किलो, सोडे 1800 रुपये, जवळा400 रुपये, अंबाड 600, माखली 600 या दराने सध्या सुकी मासळी विकली जात आहे. मासळीची आवक घटल्याने भाव कडाडलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसते आहे.
” मासळी मिळत नाही त्यामुळे तुटवडा जाणवतो आहे . होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ जमत नाही . परीणामी भाव वाढले आहेत . घाऊक बाजारात आमचा खरेदीचा दरच जास्त आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढवणे भाग पडले आहे. ” – लक्ष्मी कोळी , मासळी विक्रेत्या.