सध्या पाठ, गुडघे, कंबर आणि मान दुखीचे आजार नवीन नाहीत. अनेक जण या आजाराने त्रस्त असतात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या मंत्रालयात देखील आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक कर्मचारी हे मान, पाठ, आणि गुडघ्याच्या आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. आज मंत्रालयामध्ये तेरणा फिजिओ थेरेपी कॉलेजच्या वतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅम्पमध्ये कंबर, मान, पाठ आणि गुडघे दुखीने त्रस्त असलेले कर्मचारी थेरेपीसाठी आल्याचे पहायला मिळाले.
म्हणून कर्मचाऱ्यांना या आजाराचा सर्वाधिक त्रास –
मंत्रालयात काम करणारे बहुतेक कर्मचारी हे संगणकावर काम करत असतात. तसेच हे कर्मचारी तासनतास एकाच जागेवर बसून असतात त्यामुळे मान आणि पाठीवर सर्वाधिक ताण पडत असल्यामुळे, तसेच त्यांना बसण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे पाठ दुखी, गुडघे दुखी आणि मान दुखीचा सामना करावा लागतो. सबंधित माहिती तेरणा फिजिओ थेरेपी कॉलेजच्या प्राचार्या मेधा देव यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.
मंत्रालयात पहिल्यांदाच तेरणा फिजिओ थेरेपी कॉलेजचा कॅम्प –
तेरणा फिजिओ थेरेपी कॉलेज हे विविध ठिकाणी दरवर्षी ६ ते ७ कॅम्प घेऊन फिजिओ थेरेपीचे धडे देत असते. मात्र यंदा त्यांना पहिल्यांदाच मंत्रालयात मंत्रालयातील कर्मचाऱ्यावर उपचार करता आल्याचेही मेधा देव यांनी सांगितले. या कॅम्पमध्ये तेरणा फिजिओ थेरेपी कॉलेजचे एकूण ३५ जण सहभागी झाले होते. त्यामध्ये ११ शिक्षक, २५ इंटर्नचा समावेश होता.
मंत्रालायतील कर्मचाऱ्यांना कॅम्पमधून काय मिळाले –
या कॅम्पमध्ये गुडघ्याचा व्यायाम, मानेचा व्यायाम, बसण्याची योग्य पद्धत कशी असावी, लठ्ठपणा कसा दूर करावा, प्रसूती नंतरचा लठ्ठपणा या सर्वांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, मंत्रालयातील ५०० हुन अधिक कर्मचाऱ्यांनी या कॅम्पचा लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी कॅम्पच्या शिक्षकांनी पथनाट्य करत देखील धडे दिले.
दरम्यान आपलं महानगरने याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी देखील सतत संगणकावर बसून काम करत असल्यामुळे या आजाराचा त्रास होत असल्याची प्रतिक्रिया दिली.