दहावीचा निकाल 15 जुलैनंतर लावण्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेजांची नोंदणी झाल्यानंतर आता शिक्षण विभागाकडून 15 जुलैपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला भाग विद्यार्थ्यांना 15 जुलैपासून भरता येणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद महापालिका हद्दीत राबविण्यात येते. मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्यासाठी कॉलेजांना 12 जुलैपर्यंत नोंदणी करण्याची मुभा शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पहिला अर्ज भरता यावा यासाठी 15 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी दहावीचा निकाल लागेपर्यंत सुरू असणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला पहिला भागाची तपासणी 16 जुलैपासून करण्यात येणार आहे. कोरोनाच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पद्धतीनेच चालणार असल्याने ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिल्यास ते अमान्य ठरवण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क सुद्धा ऑनलाईनच भरायचे आहे. अकरावी अर्जाचा दुसरा भाग हा दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर भरावयाचा आहे.