महापारेषण कंपनीच्या नालासोपारातील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास दोन लाख ग्राहक बाधीत झाले असून रविवारी सुट्टीच्या दिवशी सुमारे 10 लाख लोकांना अंधारत बसावे लागले आहे. आणखी आठवडाभर अशीच परिस्थिती राहणार असल्याचे महावितरणाने जाहीर केल्यामुळे नागरिक चिंतातूर झाले आहेत.
रविवार सुट्टीचा दिवस आणि पाऊस संततधार पडत असल्यामुळे चाकरमान्यांनी घरात कुटुंबासोबत दिवस घालवण्याचा विचार केला होता. मात्र, त्यांच्या या मनुसब्यावर महापारेषणने पाणी फेरले. नेहमीप्रमाणे न कळवता शनिवारी मध्यरात्री वीज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर रविवारचा संपूर्ण दिवस दर एक तासाआड वीज गायबच होत गेली. नालासोपारा-धानीव येथील महापारेषणच्या 100 मेगावॅट ट्रान्सफार्मरमध्ये मध्यरात्री बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले.
धानीव येेथील सबस्टेशनमध्ये 200 मेगावॅटचा ट्रान्सफार्मर आहे. त्यात बिघाड झाल्यामुळे शनिवारी रात्रीपासून फक्त 100 मेगावॅटचा वीज पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे विरार, बाळींज, धानीव, पेल्हार, नालासोपारातील दोन लाख ग्राहक बाधीत झाले आहेत. या बिघाडामुळे 10 लाख नागरिक अंधारत बसले आहेत. नालासोपारा, विरार आणि वसईतील औद्योगिक वसाहतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. नविन ट्रान्सफार्मर लावेपर्यंत पुढील चार-पाच दिवस वसईकरांना दररोज विजेच्या लपंडावासह चार ते पाच तास भारनियमनालाही सामोरे जावे लागणार आहे.
औद्योगिक कंपन्या दोन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन
नविन ट्रान्सफार्मर सुरू होईपर्यंत 100 मेगावॅट विजेतून वसईकरांना वीज पुरवावी लागणार आहे. त्यामुळे वसईतील औद्योगिक कंपन्या दोन दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महावितरणाचे अधिक्षक अभियंता अगरवाल यांनी सांगितले.