मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरू पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव आता ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनही सज्ज झालं आहे. गणेशोत्सवा दरम्यान बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांवर एफडीएकडून नजर ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रसादाची मागणी केली जात असल्यामुळे खवा, मावा, दूध, तूप अशा पदार्थांमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण वाढतं. अशा पदार्थांमधून विषबाधा आणि अन्नबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने सर्वच मिठाईवर तसेच इतर पदार्थांवर करडी नजर ठेवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
अन्नसुरक्षेचे देणार धडे
गणेशोत्सवापासून ते अगदी वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या ख्रिसमसपर्यंत सणांची धूम असते. या काळात मिठाईच्या पदार्थांची मागणी वाढल्यानंतर अधिक पैसे कमवण्याच्या इच्छेपोटी विक्रेते पदार्थांमध्ये भेसळ करतात. गेल्या वर्षी बाप्पाच्या प्रसादात भेसळ झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. यंदाही, प्रत्येक प्रभागातील अन्न निरीक्षकांना प्रसादावर लक्ष ठेवण्याच्या सूचना एफडीएकडून देण्यात आल्या आहेत. शिवाय गणेश मंडळांत तयार होणार्या प्रसादावर लक्ष ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत एफडीए विविध ठिकाणी तयार होणारे पदार्थ योग्य रितीने बनवले जातात का याची तपासणी करेल, तसेच, गणेश मंडळांना अन्नसुरक्षेचे धडेडी दिले जाणार आहेत.
गणपती मंडळांनी शक्यतो स्वत: तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. भक्तांना वाटप करण्यात येणारा प्रसाद पौष्टिक असावा. प्रसादासाठी वापरण्यात येणार्या पदार्थांची गुणवत्ता तपासावी. याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांना लवकरच माहिती दिली जाणार आहे. तयार प्रसाद थंड आणि स्वच्छ जागेत ठेवण्याच्या सूचनाही मंडळांना केल्या जाणार आहेत. – शैलेश आढाव; सह-आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभाग
खवा, मावा, पेढे इत्याही प्रकारची मिठाई तयार करताना त्यामध्ये वापरण्यात येणारे घटक नाशवंत असतात. अनेकदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडून हे पदार्थ साठवून ठेवले जातात. त्यांचा काही कालावधीनंतर वापर केल्याने संसर्ग वाढून त्यातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे पदार्थांची योग्य प्रकारे तपासणी होणे गरजेचं आहे. – डॉ. पल्लवी दराडे; आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासनाच्या
हेही वाचा – ई-सिगारेट, पेन हुक्काच्या विक्रीवर एफडीएकडून बंदी