मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेला पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अशी घडली घटना
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जी.टी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपूर्वा प्रभू (३५) आणि रंजना तांबे (४०), झाहिद शिराज खान (३२), सारिका कुलकर्णी (३५), तापेंद्र सिंह (३५) आणि मोहन कायगुडे (५८) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे जे जे उड्डाणपुलाच्या दिशेने जाणारी वाहतुक दीर्घ काळ खंडित झाली होती. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड विधानातील कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता
दरम्यान, या पादचारी पुलावरुन सुरुवातीला रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली होती. रेल्वे स्थानकाच्या हद्दीत पूल हा रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत तर टर्मिनसला जोडणारा पूल महापालिकेच्या अंतर्गत येतो, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले होते. तर हा संपूर्ण पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याचे महापालिकेने सांगितले होते.
वाचा – Mumbai Bridge Collapse: ‘२ सेकंदासाठी वाचलो, पण काकांवर पूल कोसळला’
वाचा – Mumbai Bridge Collapse : नाईट शिफ्ट बेतली जीवावर