घरमुंबईपीएमसी बँक घोटाळा प्रकरणी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला अटक

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला अटक

Subscribe

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचा संचालक असलेला मुलगा रणजीत सिंग याला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

सुमारे सव्वाचार हजार रुपयांच्या पीएमसी बँक कर्ज गैरव्यव्हार प्रकरणी शनिवारी सायंकाळी भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचा संचालक असलेला मुलगा रणजीत सिंग याला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या गुन्ह्यांत अटक झालेला रणजीत सिंग हा नववा आरोपी असून त्याला रविवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. पीएमसी बँकेतील संचालक मंडळात एकूण बारा संचालक होते. त्यात भाजपचे आमदार पूत्र रणजीत सिंग यांचा संचालकामध्ये समावेश होता. या संपूर्ण घोटाळ्यादरम्यान ते बँकेचे संचालक होते. तसेच या प्रकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

रणजीतसिंहने जारी केला होता व्हिडिओ

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर रणजीत सिंगने एक व्हिडीओ जारी करुन बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. कुठल्याही गुंतवणुकदाराचे पैसे बुडणार नाहीत. त्यांना त्यांचे पैसे मिळतील असे म्हटले होते. मात्र गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. प्रत्येक वरिष्ठ अधिकार्‍यांची भूमिका स्पष्ट झाली होती.

- Advertisement -

आतापर्यंत आठ आरोपींना अटक

चौकशीत आलेल्या माहितीनंतर आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन खाजगी लेखापाल जयेश धीरजलाल संघाई, केतन प्रविणचंद्र लकावाला यांच्यासह एचडीआयएलचे अध्यक्ष राकेशकुमार कुलदिपसिंग वाधवान, महाव्यवस्थापकीय संचालक सारंग राकेशकुमार वाधवान, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी संचालक वरियमसिंग कर्तारसिंग आणि सुरजीत सिंग अरोरा, बँकेचा महिला लेखापाल अनिता किर्दंत या आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी जयेश, केतन आणि अनिता हे तिघेही सध्या पोलीस तर इतर पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे नेमके प्रकरण?

पीएमसी बँकेने २००८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत एचडीआयएल कंपनीला कोट्यचधी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. भांडुपच्या पीएमसी बँकेतून या कर्जाचे वाटप केल्यानंतर या कंपनीसह त्यांच्या संलग्न कंपनीचे कर्जाची परतफेड झाली नव्हती. या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली होती. असे असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित करण्यात आले नव्हते. तसेच ही माहिती जाणूनपूर्वक रिझर्व्ह बँकेपासून लपविण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात बँकेला 4 हजार 355 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या गैरव्यवहार संबंधित कंपनीने बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केला होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. अटक आरोपींच्या चौकशीतून रणजीतसिंह यांचाही या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पुरावे समोर आले होते, त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, या चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस येताच सायंकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली. रविारी दुपारी त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -