कुर्ला स्टेशनवर अस्वच्छ पाणी वापरुन बनवण्यात येणाऱ्या लिंबूपाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पालिका प्रशासनाला जाग आली. त्यानंतर, पुन्हा एकदा मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या व्हीडिओनंतर मुंबई महापालिकेने लिंबूपाणी विशेष मोहिम सुरू करुन लिंबू पाणी विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. यात आतापर्यंत मुंबईत रस्त्यावर लिंबू पाणी विकणाऱ्यांकडून २०४ नमुने तपासणीसाठी घेतले. त्यातील ७५ टक्के नमुन्यात लिंबूपाणी मुंबईकरांना पिण्यासाठी योग्य नसल्याचं आढळलं आहे. म्हणजेच तब्बल १५७ नमुने हे निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. तर, फक्त ४७ नमुन्यांमध्ये पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचं आढळून आलं.
कडाक्याच्या उन्हाळ्यात गॅस्ट्रॉची वाढ
सोबतच दूषित पाण्यासह खराब बर्फ आणि उघड्यावरच्या खाद्यपदार्थांमुळे मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत मुंबईत गॅस्ट्रोच्या २ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून या रुग्णांवर पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये नोंद करण्यात आली आहे. खरंतर पावसाळ्यात गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. पण यंदा कडाक्याचं ऊन पडल्याने उन्हाळ्यात ही या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबईत २ हजार १०८ रुग्णांची नोंद
शहरात मोठ्या प्रमाणात गरमी वाढल्याने प्रत्येक जण रस्त्यावरील थंडपेयांचं सेवन करतो. पण, हे पाणी दुषित असल्याने विविध संसर्गजन्य आजारांची साथ पसरायला सुरुवात झाली. पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत मुंबईत गॅस्ट्रोच्या २ हजार १०८ रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरियाच्या ४६४ रुग्ण, हेपटायटीसच्या २७६ रुग्ण, स्वाईन फ्लूच्या १२१ रुग्ण, तसंच, डेंग्यूच्या ४४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.