मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र पालिकेने नुकत्याच केलेल्या तपासणीत सध्या सापडत असलेल्या रुग्णांमधील २० टक्के रुग्ण हे लग्न-सोहळे व अन्य कार्यक्रमात सहभागी झाले असल्याचे उघडकीस आले आहे. लग्न, समारंभ मर्यादित व्यक्तींच्या उपस्थित करण्याचे सरकारचे निर्देश असतानाही अनेक ठिकाणी नियमाचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने लग्न समारंभांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रित आला असून काही महिन्यांपासून कोरोना संक्रमित रुग्ण व मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे. रुग्णसंख्या कमी करण्याचा पालिका आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. मात्र मुंबईमध्ये सध्या सापडत असलेले कोरोना रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे लग्न व विविध समारंभात सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन ते तीन महिन्यांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणशत लग्न समारंभ सुरू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आता लग्नाच्या सभागृहांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. शहर व उपनगरातील सभागृहांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात लग्न होत असून, त्यामध्ये पालिकेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही उघड झाले आहे. समारंभात नागरिक एकत्र येत असल्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, लग्न सभागृहांमध्ये येणार्या नागरिकांची इत्यंभूत माहिती सभागृह व्यवस्थापनाने पालिका प्रशासनाला देणे बंधनकारक केले आहे.
लग्न सभागृहात हजर राहणार्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता अशी इत्यंभूत माहिती सभागृह व्यवस्थापनाने घेण्याचे निर्देश दिले आहेत. समारंभासाठी एकत्रित येणार्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असून, त्यावर सभागृह व्यवस्थापनाचा अंकुशही नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोरोना संक्रमित रुग्ण समारंभातून आढळून येत असल्याचे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सागिंतले.
लग्न समारंभात काही ठराविकच नागरिक असणे गरेजेचे आहे पण नियमांचे पालन होत नाही. ज्यामुळे कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे विविध समारंभात सहभागी झाले होते.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका