कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात ग्लोव्हजचा वापर करत आहेत. परंतु, हे ग्लोव्हज निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. ग्लोव्हज पॅकिंग केल्यानंतर त्याच्यावर अणू किरणोत्सराचा भडीमार करून ते निर्जंतुक करण्यात येतात. परंतु सध्या असलेली मागणी लक्षात घेता अनेक वितरक ही प्रक्रिया टाळून ग्लोव्हज थेट बाजारात आणत आहेत. परिणामी ते वापरण्यास अयोग्य ठरत असून त्यामुळे जंतूंचा अधिक प्रसार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी मास्क, ग्लोव्हजचा वापर करण्याचे आवाहन डॉक्टर व सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच सर्वच डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांकडून सर्जिकल आणि एक्झाम ग्लोव्हजचा वापर करण्यात येत आहे. एक्झाम ग्लोव्हजची हे फारच पातळ असल्याने ते मशीनमध्ये बनवत असताना फाटले जातात. त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे भारतामध्ये याचे फारसे उत्पादन होत नाही. त्यामुळे हे ग्लोव्हज अन्य देशातून आयात केले जातात. आयात केलेले हे ग्लोव्हज मोठ्या कंटेनरमधून भारतात येतात. त्यानंतर सुट्ट्या स्वरूपात असलेले हे ग्लोव्हज कंपन्यांकडून खोक्यांमध्ये भरून निर्जंतुक करण्यासाठी पाठवले जातात.
किरणोत्सराचा मारा करून हे ग्लोव्हज निर्जंतुक झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. परंतु, सध्या कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी, खासगी रुग्णालयाबरोबरच सर्वसामान्य व्यक्तीही याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक कंपन्या व वितरक खोक्यांमध्ये ग्लोव्हज भरल्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी न पाठवता थेट बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे ग्लोव्हज खोक्यांमध्ये भरताना कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली होती का? त्यांना कोणती व्याधी आहे का? त्यांना कोणता आजार आहे का? याबाबत कंपन्यांकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. पॅकिंग करणाऱ्या एखाद्या कोणत्या कर्मचाऱ्याला आजार असल्यास त्याचे विषाणू ग्लोव्हजमार्फत डॉक्टर आणि रुग्णांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. परिणामी निर्जंतुकीशिवाय बाजारामध्ये येत असलेले ग्लोव्हज हे अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे. सुरक्षित म्हणून जे ग्लोव्हज आपण घालत आहोत ते खरंच सुरक्षित आहेत का? याबाबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये शंका उपस्थित करण्यात येत असल्याची माहिती ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनचे अध्यक्ष अभय पांड्ये यांनी दिली.
निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बाजारात येत असलेले ग्लोव्हज ही बाब गंभीर आहे. यावर तातडीने नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि अन्न व औषध विभागाला पत्र लिहिले आहे.
– अभय पांड्ये, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशन