राज्यातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा भागात गाई, बैल यांच्यासारख्या पशूधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येते. मात्र आता या अंतर्गत मेंढी आणि शेळीसाठी देखील पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी आपण जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन पशु, दुग्ध आणि मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. राज्यातील मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात राज्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
जेनेरिक औषध उपलब्ध करावी
खोतकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची आस्थेने चौकशी केली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. धनगर समाजातील मेंढपाळ हा घटक राना वनात भटकंती करुन उदरनिर्वाह करतो. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणे, दरोडे पडणे यासारख्या बाबी घडून येतात. या दरोड्यांची चौकशी व्हावी यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले. त्यासोबत मेढ्यांवरील रोगाचे निदान करण्यासाठी पुणे येथे प्रयोगशाळा देखील सुरु करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. तसेच सर्वसामान्य मेडिकलमध्ये मेंढ्यावरील औषधांच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील उपचाराचा खर्च देखील वाढतो. त्यामुळे सर्वसामान्य मेडिकलमधील औषधांचा वापर न करता कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या जेनेरिक औषधांचा वापर करावा आणि ही औषध उपलब्ध करून द्यावी या देखील मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या शिष्टमंडळात लहू शेवाळे, अजित खरात, नामदेव बाजोडे, शिवलाल बोंद्रे आणि वर्षाताई खताळ यांचा देखील समावेश होता.