दसऱ्याचा मुहूर्त साधत मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारीरात्रीपासून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मुलुंड, उल्हासनग आणि भांडुपमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. मागील काही दिवसांमध्ये पावसामध्ये अनियमितता असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. पण, आज रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास ४ ते ५ दिवसांच्या विश्रातीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. तसेच राज्यातल्या काही भागांमध्ये देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
वीज पुरवठा खंडीत
उल्हासनगरमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
रिक्षावर कोसळले झाड
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या मागे असणाऱ्या नागसेन नगर येथे एका रिक्षावर झाड पडल्याची घटना घडली आहे.