डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी अवजड वाहतुकीसाठी हा पूल तातडीने बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गुरूवारी वाहतूक शाखेच्यावतीने अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान, कोपर पुलाची संपूर्ण दुरुस्ती होईपर्यंत नवीन ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपुलावरुन जड/अवजड वाहनांची वाहतूक करण्यात यावी, असेही महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – मुंबईकर अनेकदा गटारांची झाकणं उघडी ठेवतात – महापौर
वाहतूक बंद करण्यास मनसेने विरोध केला होता
मुंबई आयआयटीने स्ट्रक्चरल ऑडिट करीत कोपर उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला पूल धोकादायक झाल्याचे पत्र पाठवून २७ मे पासून उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय कळविला होता. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णया विरोधात पालिका आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. सहा महिन्यांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात पूल धोकादायक नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यास मनसेने तीव्र विरोध दर्शविला होता.
नवीन ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपुलावरुन वाहतूक करावी
अखेर काही दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली होती. पुलाचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा झालेल्या बैठकीत आयआयटी पवई यांनी दिलेल्या अहवालावर सविस्तर चर्चेअंती सदर अहवालातील मुद्द्यांनुसार महत्वाच्या दुरुस्तीची कामे रेल्वेने करावी, तर पुलावरील किरकोळ दुरुस्तीची कामे महापालिकेने करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. कोपर पुलाची संपूर्ण दुरुस्ती होईपर्यंत नवीन ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपुलावरुन जड/अवजड वाहनांची वाहतूक करण्यात यावी, असेही महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.