मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हासनगर शहरातील सखल भागातील घरं, दुकाने, कंपन्यांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. परिणामी उल्हासनगर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, राजकीय नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत असल्याचे चित्र आहे.
शहरातील घरं, दुकानांत पूराचे पाणी
पावसामुळे वालधुनी आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्राजवळ आणि सखल भागात भरतनगर, शांतीनगर, मीनाताई ठाकरे नगर , १७ सेक्शन, सुभाषनगर, सम्राट अशोक नगर, संजय गांधीनगर, रेणूका सोसायटी, नगरपंचशील नगर, रेणूका सोसायटी वरप, हिराघाट, करोतीया नगर, शहाड, कांबा, वरप या परिसरातील घरं, दुकाने, कंपन्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
स्वयंसेवी संस्थांसह राजकारण्यांची मदत
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. यावेळी राजकीय नेत्यांनीही मदतीचा हात पुढे केला. माजी आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना खाद्य सामग्री पुरवली. तर टाऊन हॉल येथे ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे, अशा अनेक कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी, ओमी कलानी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सेंच्युरी कॉलनी, ओम साई नगर, म्हारळ, कांबा, वरप, सम्राट अशोक नगर आदी परिसरात पूरग्रस्तांना मदत करून खाद्य सामग्रीचे वाटप केले. तसेच येथील पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था कलानी महल येथे करण्यात आली.
पालकमंत्र्यांसह शिवसैनिकांचे मदतकार्य
वरप, कांबा, म्हारळ या ठिकाणी सर्वात जास्त पूराचा फटका बसला असून सैन्यदलाची रेस्क्यू ऑपरेशन टीम पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावाचे कार्य करित आहे. या टीम सोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह शेकडो शिवसैनिक मदतकार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे उल्हासनगर रिपाई शहर अध्यक्ष भगवान भालेराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करून खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
थारा सिंग दरबार तर्फे अन्नदान
१७ सेक्शन जवळ असलेल्या थारा सिंग दरबार येथे मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास १० हजार लोकांना वडापाव वाटण्यात आले. काल रात्री ११ वाजेपासून आतापर्यंत ३० ते ४० हजार लोकांना अन्नदान वाटप केल्याची माहिती या दरबाराचे प्रमुख टिल्लू भाई साहेब यांनी दिली.
मनपाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आमदार ज्योती कलानी, आरोग्य निरीक्षक विनोद केणी, अग्निशमन दल प्रमुख भास्कर मिरपगारे आदी मनपाच्या अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ सुविधा पुरविल्या.