घरमुंबईभाजपला २१०-२२५ पेक्षा जास्त जागा मिळणे कठीण

भाजपला २१०-२२५ पेक्षा जास्त जागा मिळणे कठीण

Subscribe

हिंदी भाषिक राज्यांमध्ये  यावेेळी पीछेहाट, ईशान्य भारतात भाजपचा जोर

लोकसभा निवडणूक ऐन भरात आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदानही झालेले आहे. पण त्यापूर्वी विविध वृत्तवाहिन्या आणि कंपन्यांनी केलेले आोपिनियन पोल प्रकाशित करण्यात आले. या ओपिनियन पोलमध्ये भाजप थेट सत्तेेत येत असल्याचे अनुमान काढण्यात आले आहेत. मात्र प्रत्येक राज्यात २०१४ साली भाजपला मिळालेल्या जागा, काही राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती, विरोधकांच्या आघाड्या यांचा अभ्यास केला तर भाजपला या निवडणुकीत जास्तीत जास्त २१० ते २२५ जागा मिळतील अशी स्थिती आहे. मोदी लाटेच्यावेळी भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. आता मात्र देशात कुठेही मोदी लाट नाही. मोदींच्या गुजरातमध्येही नाही. त्यामुळे ओपिनियन पोल यावेळी किती खरे ठरणार याबाबत साशंकता अधिकच वाढली आहे

मोदी लाट नसल्यानेच महाराष्ट्रातही फटका   

2014 मध्ये भाजपला मोदी लाटेच्या जोरावर ज्या जागा मिळाल्या होत्या त्या टिकवणे २०१९मध्ये कठीण असल्याचे दिसते. त्या राज्यात काँग्रेसचा फायदा होऊ शकतो. तर भाजपला ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात २०१४ च्या तुलनेत जास्त जागा मिळू शकतात.

- Advertisement -

ओपिनियन पोलची  विश्वासार्हता किती

मुंबई 8 ओपिनियन पोलचा गोंधळ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कायम आहे. नुकत्याच चार ओपिनियन पोलच्या आकड्यांमध्येही मोठी विसंगती आहे. तरीही या चारही ओपिनियन पोलच्या आकडेवारीची सरासरी काढली तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला निसटते बहुमत मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे २०१४ साली घेण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये कोणतेही स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला नव्हता. तरीही भाजपला बहुमत मिळाले. तर २००९ साली घेण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएला जितक्या जागा दाखवण्यात आल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे ओपिनियन पोलची विश्वासार्हता किती हा प्रश्न कायम आह

गेल्या काही दिवसांत सी-व्होटर, इंडिया टीव्ही-सीएनएक्स, सीएसडीएस-लोकनिती आणि टाईम्स नाऊ-व्हीएमआर या कंपन्यांनी देशभरात ओपिनियन पोल घेतले. या चारही कंपन्यांच्या ओपिनियन पोलच्या आकडेवारीत एनडीएला ५४३ पैकी २७३ जागा मिळताना दिसत आहेत. बहुमताच्या एक जागा जास्त गेल्या निवडणुकीत एनडीएला ३३० जागा मिळाल्या होत्या. गेल्या तीन दशकातील हे सर्वात मोठे बहुमत आहे. मात्र २०१४ सालच्या ओपिनियन पोलचा विचार केला तर सी-व्होटर, नेल्सन, सीएसडीएस-लोकनिती, हंसा रिसर्च या ओपिनियन पोल कंपन्यांनी एनडीएला दिलेल्या जागांची सरासरी काढली तर एनडीएला २०४ जागा दाखवल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात एनडीएला ३३० जागा मिळाल्या. एनडीएला बहुमत मिळेल याचा कोणी विचारही केला नव्हता. त्या तुलनेत २०१९ मध्ये एनडीएच्या जागा ६९ ने वाढल्या आहेत.

- Advertisement -

२००९ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सीएसडीसी, नेल्सन, सी व्होटर आणि टाईम्स ऑफ इंडिया या कंपन्यांनी ओपिनियन पोल घेतला होता. त्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला सरासरी २३२ जागा दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा युपीएला २६२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मागील तीन लोकसभा निवडणुकीत ओपिनियन पोलचा इतिहास पाहिला तर ओपिनियन पोलमध्ये राजकीय पक्ष अथवा आघाडीला जास्त मिळणार्‍या जागा या प्रत्यक्ष निकालात वाढतात. त्यामुळे ओपिनियन पोलची विश्वासार्हता पणाला लागली असली तरी काही राजकीय पक्ष आणि आघाड्यांसाठी ही खूशखबर आहे.

ओपिनियन पोल घेताना ढोबळपणे पोलिंग बूथप्रमाणे सर्व्हेक्षण घेतले जाते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हे सर्व्हेक्षण कधी समोरा, समोर तर कधी फोनद्वारेही घेतले जाते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे येथे नेमकी माहिती मिळताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. इतकेच स्थानिक जातीची समीकरणे, राजकारण समजून घ्यावे लागते. त्यातही माहिती देणारा आणि माहिती घेणारा ज्या इमानदारीने माहिती देतो आणि घेतो, यावर ओपिनियन पोलचा निकाल अवलंबून असतो. तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणारी व्यक्ती राजकारण किती जाणते यावरही ओपिनियन पोल किती खरे अथवा खोटे ठरतात हे दिसून येते.
– अजित शुक्ला, पॉलिटिकल एडिटर, सी-व्होटर

महाराष्ट्रात युतीचे संख्या बळ घटणार;४२वरून ३२ वर?

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे लाकेसभा निवडणुकीत काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३,शिवसेना १८ आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमान पक्षाला १ अशा मिळून ४२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. स्वाभिमानी पक्ष युतीतून बाहेर पडून आघाडीत गेला आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघता यावेळी ४२ जागा टिकवणे युतीला कठिण जाण्याची चिन्हे आहेत.पहिल्या टप्प्यातील मतदान पहाता युतीला राज्यात फार तर ३०-३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपला १८ ते २० जागा तर शिवसेनेला १० ते १२ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

भाजपच्या वाढणार्‍या जागा

दुसर्‍या बाजूला भाजपच्या वाढणार्‍या जागांचा विचार केला तर होणार्‍या जागांची घट भरून काढण्यासाठी नव्याने मिळू शकणार्‍या जागा पुरेशा नाहीत. आसाममध्ये भाजपची सध्या चलती आहे. त्यामुळे येथे मागच्यावेळे इतक्या म्हणजे १४ जागा मिळतील असे गृहित धरू. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) भाजपच्यासोबत आहे त्यामुळे बिहारमध्ये मागच्यावेळी लोक जनशक्ती पार्टी मिळून भाजपला २८ जागा होत्या. त्या आता वाढून अगदी ३५ होतील. केरळमध्ये दोन-तीन जागा खूपच मणीपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड ही राज्यच मुळात एक-दोन जागांची आहेत. ओडिशात चांगली कामगिरी होईल असे गृहित धरून तेथे अगदी १४, १५ जागाही मिळतील. पण तामिळनाडूत भाजपच्या वाट्याला फार काही येईल अशी अपेक्षा नाही. उलट अण्णाद्रमुकच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप ७ ते आठ जागा मिळवू शकतो. याचा एकंदरीत विचार केला तर २० ते २२ जागा या राज्यांमधून भाजपच्या वाढतील.एकूणच ईशान्य भारतामध्ये भाजपचा जोर दिसत असून मोदी लाट नसल्याने ईशान्यमधील ७ राज्य भाजपला साथ देऊ शकतात असे सध्यातरी चित्र आह मात्र कमी होणार्‍या जागांचा विचार केला तर भाजपच्या जागा फार-फार तर २२५ ते २३० पर्यंत जातील. त्यापेक्षा जागा केवळ चमत्कार झालाच तर भाजपला मिळण्याची शक्यता आहे

भाजपच्या कमी होणार्‍या जागा

भारतीय जनता पक्षाला किमान १३ राज्यांमध्ये या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष भाजपच्यासोबत नाही. त्यामुळे भाजप, टीडीपीला २०१४ सालच्या निवडणुकीत ज्या १७ जागा मिळाल्या होत्या त्या कमी होण्याची शक्यता आहे. भाजपला आंध्र प्रदेशात दोन जागा मिळू शकतात. पर्रिकर यांच्या निधनामुळे गोव्यात दोनच्या दोन जागा मिळवणे भाजपला अवघड आहे. छत्तीसगड विधान सभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यांचे राज्य गेले. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडच्या ११ पैकी ११ जागा जिंकणे भाजपला अवघड आहे. तसेच गुजरात, राजस्थानमध्येही अनुक्रमे २६आणि २५ जागा म्हणजे पैकीच्या पैकी जागा जिंकणे कठिण दिसतेय. महाराष्ट्रात दुष्काळ टीपेला आहे. त्याचा राग सरकारवर निघणार. त्यामुळे यावेळी ४१ पैकी ४१ जागा भाजपला मिळू शकत नाहीत.

मध्य प्रदेशात २९ पैकी २७ जागा, हरयाणात १० पैकी ७ जागा आणि कर्नाटकात २८ पैकी १७ जागा जिंकणे भाजपला शक्य होईल असे वाटत नाही. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षसोबत असल्यामुळे भाजपला ३७ जागा आहेत. या निवडणुकीत जय ललिता नाहीत. तसेच अण्णाद्रमुक पक्षातही दुफळी आहे. त्याचा फटका अण्णाद्रमुकसोबत भाजपला बसणार. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या ३७ जागा ज्या २०१४ मध्ये भाजपसाठी वरदान ठरल्या होत्या त्या यावेळी नसणार.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा मिळवत भाजपने दिल्ली काबीज केली होती.यावेळी दिल्लीत तितकीशी सोपी राहिलेली नाही. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची दिल्लीत युती झालेली आहे. त्यामुळे दिल्लीतील पैकीच्या पैकी जागा भाजपला मिळणे शक्य होईल असे वाटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल एकत्र आले आहेत. तसेच यावेळी मोदी लाटही नाही. त्यामुळे ८० पैकी ७१ जागा जिंकणे भाजपला जवळजवळ मुश्किल आहे. अशा एकंदर परिस्थितीत या १२ राज्यांमधून भाजपला कमीत कमी ४५ ते ५० जागांचा फटका बसू शकतो.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -