”तपास यंत्रणांची दहशत निर्माण करुन आपल्या वैचारिक शत्रूंना संपवण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा डाव सत्ताधार्यांनी आखला आहे. राज ठाकरे आणि चिदम्बरम हे त्याचेच उदाहरण आहे,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. चिदम्बरम यांना झालेली अटक आणि राज ठाकरे यांची ईडीमार्फतची चौकशी या संदर्भात पत्रकारांनी आमदार आव्हाड यांच्याशी संवाद साधला असता आमदार आव्हाड यांनी ही टीका केली.
हेही वाचा – आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी – संजय राऊत
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”ज्या पद्धतीने पी. चिदम्बरम यांची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर सीबीआय त्यांच्या घरात घुसली. हे देशाच्या राजकारणात कधीच न पाहिलेले चित्र आहे. तपास यंत्रणांची दहशत बसवण्याचा जो प्रयत्न सुरु झाला आहे. त्या माध्यमातून आपल्या राजकीय, वैचारिक शत्रू आहेत. त्यांना संपवूनच टाकायचे; उध्वस्त करुन टाकायचे, हे धोरण आखले जात असून ते अत्यंत चुकीचे आहे. राज ठाकरे यांचे वर्ष २०१२ चे प्रकरण आहे; आज वर्ष २०१९ सुरू आहे. वर्ष २०१४ ते २०१९ मध्ये काय केले? त्यामुळेच लोकांच्या मनात संशय येतो ना की हे का चालू आहे? कशासाठी चालू आहे? अन् लोकांची ही शंका रास्तदेखील आहे.”
हेही वाचा – काँग्रेसचे इतर दिग्गज नेतेही जाणार तुरुंगात – डॉ. सुब्रमण्यम स्वामी
ही तर मराठी संस्कृतीच
दरम्यान ईडीच्या चौकशीला राज ठाकरे हे सहकुटूंब गेल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ”मराठी संस्कृती आहे. शिवराय लढत असताना त्यांची आई म्हणजे जिजाऊ या शिवरायांच्या सोबत उभ्या राहिल्या होत्या. जेव्हा-जेव्हा आपल्या घरात आपला कर्ता पुरुष अडचणीत येतो तेव्हा आई, बहीण, पत्नी उभी राहतेच ना? ही मराठी मातीची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांची पत्नी सोबत असणे हे आक्षेपार्ह नाही,” असे आमदार आव्हाड यांनी सांगितले.