काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी होय नाय करत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपमधील प्रवेवशावरुन सर्वच पक्षाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. पालकांनी विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी’, असं ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी !
-जनहितार्थ जारी— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 12, 2019
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे -पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी धनश्री यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विटरवरुन भाजपला लक्ष्य केले. महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, जनहितार्थ जारी, असं ट्विटमध्ये आव्हाडांनी म्हटले आहे. आव्हाडांच्या ट्विटरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस करता ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे अहमदनगरमधील आघाडीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरुनच जितेंद्र आव्हाडांनी भाजपला महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाले असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. दिलीप गांधींची अवस्था पाहून भाजपच्या निष्ठावंतांची दया येत असल्याच ट्वीट त्यांनी केले होते.